श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौर्‍याच्या वेळी साधकाने अनुभवले त्यांचे पंचमहाभूतांवरील नियंत्रण !

२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

३. विदेश दौरा यशस्वी होण्यासाठी चेन्नई येथील समुद्रकिनार्‍यावर पूजा करतांना आलेल्या अनुभूती

अ. ‘आम्ही समुद्रकिनारी पोचल्यावर समुद्रातून एक सूप वहात आमच्याकडे येत होते. सूप हे श्री लक्ष्मीदेवीचे प्रतीक आहे. त्याचे दर्शन केल्यानंतर ते काही वेळाने दिसेनासे झाले आणि समुद्रामध्ये विलीन झाले.

आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी समुद्र नारायणाची पूजा करण्यास आरंभ केला.

इ. त्यांनी हळद, कुंकू, काही फुले, गजरा, नारळ अर्पण करून शेवटी उदबत्ती दाखवून पूजा केली. त्यानंतर त्या तिथे प्रार्थना करत उभ्या राहिल्या. तेवढ्यात त्यांनी समुद्र नारायणाला अर्पण केलेला नारळ पाण्याच्या लाटेने बाहेर आला आणि काकूंच्या उजव्या चरणाला स्पर्श करून, काही क्षण थांबून परत समुद्रामध्ये गेला. हा आम्हाला देवाचा मोठा आशीर्वाद मिळाला.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

ई. काकूंनी बाजूला लावलेली उदबत्ती एका क्षणामध्ये समुद्राच्या लाटे समवेत वाहून गेली.

उ. समुद्र नारायणाला फुले आणि गजरा अर्पण केला होता. त्यातील गजरा त्याने स्वीकारला होता आणि गुलाबाची थोडी फुले थोड्या वेळाने परत बाहेर आली.

ऊ. त्या फुलांकडे पाहून मला वाटले की, ‘समुद्र नारायण साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगत आहेत, ‘तुम्ही विदेश दौरा आनंदाने करा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही समुद्रावरून एवढ्या लांब प्रवास करणार आहात’, त्यासाठी माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.’ हे सर्व पहातांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची आणि आमची भावजागृती झाली.

ए. ‘देव आपली काळजी घेतांना काहीतरी संकेत देऊन आपल्याला चिंतेतून बाहेर काढतो’, असे मला वाटले. समुद्रावरून विदेशामध्ये जाण्याचा प्रवास १० घंट्यांपेक्षा अधिक होता.

४. विदेश दौरा करून परत येणे, चेन्नई विमानतळावरून चेन्नई सेवाकेंद्राकडे जातांना तीर्थ शिंपडल्याप्रमाणे हळूवार पाऊस पडणे आणि वरुणदेवाने आशीर्वाद दिल्याचे वाटणे

३०.४.२०२३ या दिवशी पहाटे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ विदेश दौरा करून चेन्नई विमानतळावर येणार होत्या. त्या येण्यापूर्वी चेन्नई येथील वातावरणात पुष्कळ उष्णता होती. त्यांना आणण्यासाठी मी आणि एक साधक गेलो होतो. विमानतळावर जातांना बाहेर आकाश निरभ्र होते. आम्ही त्यांना घेऊन चेन्नई सेवाकेंद्राकडे निघालो आणि वाटेत पाऊस चालू झाला. त्या वेळी तीर्थ शिंपडावे, तसा ५ ते १० मिनिटे पाऊस पडला. तो पाऊस आशीर्वाद स्वरूपाचा होता. ‘त्यांचा विदेश दौरा हा दैवी दौरा झाला असल्याचा वरुणदेवाने आशीर्वाद दिला’, असे मला वाटले.

संत नेहमी म्हणतात, ‘देव हा भावाचा भुकेला असतो. तुम्ही काहीही केलेले असेल आणि त्यामध्ये तुमचा निर्मळ भाव असेल, तर तुम्ही जी गोष्ट करता ती देव आनंदाने स्वीकारतो.’ (क्रमशः)

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (३०.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/731591.html