प.पू. आबा उपाध्ये यांनी साधिकेला प्रसाद म्हणून दिलेल्या बेलाच्या पानाचे वर्ष २०२३ मधील यू.ए.एस्. रिडिंग नकारात्मक येण्यामागील कारण

‘वर्ष २०१४ मध्ये सुश्री (कु.) आरती तिवारी यांना प.पू. आबा उपाध्ये यांनी प्रसाद म्हणून बेलाचे पान दिले होते. सुश्री (कु.) आरती तिवारी या पानाला नियमित कपाळावर लावायच्या. वर्ष २०२३ मध्ये त्या पानाचे यू.ए.एस्. उपकरणाने चाचणी केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. या संदर्भातील सूक्ष्म स्तरीय कारण पुढे दिले आहे.

प.पू. आबा उपाध्ये
श्री. निषाद देशमुख

१. संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या वस्तूंना ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांचे बंधन असून त्यांचे कार्य ‘कालांतरासाठी चैतन्य पुरवणे’, असे असणे

स्थुलातील प्रत्येक घटकाला उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे बंधन असते. हा ईश्वरी नियम संतांनी दिलेल्या वस्तूंनाही लागू होतो. त्यामुळे संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या स्थुलातील वस्तूंवरही ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ हा नियम लागू होतो. आध्यात्मिक त्रास, काळमहिमा किंवा अन्य कारणांमुळे जिवाला स्वतः चैतन्य ग्रहण करणे शक्य होत नसल्यास त्याला काही काळासाठी चैतन्याचा पुरवठा व्हावा; म्हणून संत स्थुलातून प्रसाद देतात.

नवीन जन्म घेतलेल्या बाळाला बाहेरचे अन्न पचवता येत नाही, यासाठी काही काळ आईच्या स्तनात दूध निर्माण होते आणि पुढे ते दूध निर्माण होणे बंद होते. त्याच प्रकारे साधकाचे विशिष्ट त्रास दूर करण्यासाठी, अध्यात्मातील विशिष्ट टप्पा ओलांडेपर्यंत किंवा विशिष्ट काळासाठी संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य कार्यरत असते, तर पुढे ते अल्प होत जाते. असेच साधिकेच्या संदर्भातही घडले. यामुळे वर्ष २०२३ मध्ये त्या बेलाच्या पानाची यू.ए.एस्. चाचणी केल्यावर त्यात सकारात्मक ऊर्जा न आढळता, त्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.

२. संतांनी प्रसाद म्हणून दिलेले स्थुलातील  घटक पृथ्वीतत्त्वाशी निगडित असून त्यात साधक अडकल्यावर त्यावर शीघ्र त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण होणे

या प्रसंगात संतांनी प्रसाद म्हणून दिलेला स्थुलातील घटक पृथ्वीतत्त्वाशी निगडित होता. अन्य पंचतत्त्वांच्या तुलनेत पृथ्वीतत्त्व सर्वाधिक सगुण असल्याने त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्पंदनांचे परिणाम लगेच अन् अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे चैतन्य देण्यासाठी संतांनी ते माध्यम निवडले होते. असे असले, तरी कालांतराने त्यातील चैतन्य न्यून होत जाऊन त्या प्रसादाविषयी साधिकेची आसक्ती वाढत गेली. एखाद्या व्यक्तीची एखाद्या घटकाच्या संदर्भात आसक्ती निर्माण झाल्यावर त्याची स्पंदने त्या घटकातील सात्त्विकता न्यून करतात. यामुळे त्या प्रसादावर सूक्ष्मातून आक्रमणे करून त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण करणे अनिष्ट शक्तींना सहज आणि शीघ्रतेने शक्य होते. असेच या प्रसंगातही घडल्याने साधिकेला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या पानावर सूक्ष्मातून आक्रमणे करून त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण केले. यामुळे वर्ष २०२३ मध्ये त्या पानाचे यू.ए.एस्. उपकरणाने चाचणी केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.

३. संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या नश्वर वस्तूंना न्यूनतम २ ते ३ आठवडे, तर अधिकतर १ मास वापरणे योग्य

अध्यात्मात ‘वर्तमानकाळात रहाणे’ आणि ‘त्याग करणे’, या दोन्ही सूत्रांना पुष्कळ महत्त्व आहे. देव सोडून अन्य सर्व नश्वर असल्याने अध्यात्मात वेळोवेळी त्याग करावाच लागतो. यामुळे संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या वस्तूंच्या माध्यमातून चैतन्य ग्रहण करून साधनेचे प्रयत्न वाढवणे, ही संतांप्रती खरी कृतज्ञता असते. यामुळे संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या आणि काळानुसार खराब होणार्‍या वस्तू उदा. पुष्प, पान इत्यादींना २ ते ३ आठवडे किंवा अधिकाधिक १ मास वापरून मग त्या विसर्जित करणे अधिक योग्य ठरते. अशा वस्तूंचे चैतन्य टिकून रहावे; म्हणून त्यांची प्रतिदिन सात्त्विक उदबत्तीचा धुराने शुद्धी करणे, त्यांना उन्हात ठेवणे इत्यादी उपाय करावे. या वस्तूंच्या संदर्भात काही शंका असल्यास ती त्या त्या वेळी साधनेतील मार्गदर्शक गुरूंना विचारल्यामुळे ‘वर्तमानकाळात रहाणे’, हे तत्त्व आचरण्यात साहाय्य होईल.’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), फोंडा, गोवा. (२०.१.२०२३)

यू.ए.एस्. रिडिंग’मध्ये बेलाच्या पानात नकारात्मक ऊर्जा आढळणे

‘१७.१.२०२३ या दिवशी या बेलाच्या पानाचे यू.ए.एस्. परीक्षण श्री. आशिष सावंत यांनी घेतले. या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. या पानातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३३ मीटर आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २२.९० मीटर आली. (या पानावर अत्यल्प विभूती असल्याने ती संशोधनासाठी वेगळी मिळणे शक्य झाले नाही. त्यामुळे विभूतीचे रिडिंग घेता आले नाही.)’
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.१.२०२३)  

प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडून प्रसाद म्हणून आलेल्या बेलाच्या पानातून विभूती मिळण्याची साधिकेला आलेली अनुभूती

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडून  आलेले बेलाचे पान प्रसाद म्हणून मिळणे

‘वर्ष २०१४ मध्ये प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडून आलेले बेलाचे पान एका पिशवीत घालून मला प्रसाद म्हणून देण्यात आले होते. त्या पानाला किंचित् विभूती होती. ते पान मला देतांना एक साधिका म्हणाली, ‘‘ताई, हे पान जीर्ण झाल्यावर तू विसर्जित करू शकतेस.’’ ते पान अजूनही माझ्याकडे आहे.

२. प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडून मिळालेले पान जीर्ण झालेले असूनही त्या पानातून विभूती मिळण्याचे प्रमाण वाढणे  साधारण १ वर्षापूर्वीपर्यंत प.पू. आबांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद म्हणून मी ते पान नित्यनेमाने कपाळाला लावायचे. आता त्या पानातील विभूती मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. ते पाहून ‘प.पू. आबांची कृपा त्या पानाच्या माध्यमातून मला अखंड मिळत आहे’, असे मला जाणवले.

३. प.पू. आबांकडे असणार्‍या डब्यातून विभूती येऊन त्यात वाढ होत असणे आणि तशीच अनुभूती प.पू. आबांनी त्यांच्या देहत्यागानंतरही साधिकेला देणे

प.पू. आबांकडे एक डबा असायचा. त्या ‘डब्यात आपोआप विभूती येऊन त्यात वाढही होत असे’, अशाही अनुभूती मी ऐकल्या आहेत. तशीच अनुभूती मलाही येत आहे. अनुभूतींच्या माध्यमातून मला कृपाशीर्वाद दिल्याबद्दल मी प.पू. आबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. प.पू. आबा यांच्या देहत्यागानंतरही आजही त्यांची कृपा माझ्यावर आहे.

‘हे गुरुराया (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्याच कृपेने प.पू. आबा उपाध्ये यांचा कृपाप्रसाद मला मिळाला. मला आजही त्यांची कृपादृष्टी अनुभवता येत आहे, त्यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, फोंडा, गोवा.  (६.११.२०२२)