देशद्रोही पत्रकारिता करणारे आणि चीनने पोसलेले दलाल पत्रकार !

देशाला बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक, आचार्य प्र.के. अत्रे आदी पत्रकारांचा श्रेष्ठ वारसा आहे. असे असतांना आज ‘न्यूजक्लिक’सारख्या एका ‘न्यूज पोर्टल’द्वारे (वृत्तसंकेतस्थळाद्वारे) चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची दलाली घेऊन भारतविरोधी पत्रकारिता केली जाते, हे आजच्या पत्रकारितेला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अशा पत्रकारांवर अटकेची कारवाई केली. त्यावर तथाकथित पुरोगाम्यांची ‘हा पत्रकारितेवरील आघात आहे’, अशी ओरड चालू आहे. असे असेल, तर ‘न्यूजक्लिक’च्या पत्रकारांनी चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची देणगी का स्वीकारली ? कशाच्या बदल्यात या निवडक पत्रकारांना चीनकडून देणगी देण्यात आली ?’, हे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत.

१. भारताशी उघडपणे शत्रूत्व घेणारे देशद्रोही पत्रकार !

‘भारतामध्ये पूर्वी नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात भांडवलशाही अमेरिकेचा विरोध म्हणून साम्यवादी (कम्युनिस्ट) हे रशियाद्वारे पोषित राजकारण अन् पत्रकारिता करत होते’, अशी ग्वाही ‘केजीबी’ या रशियन गुप्तचर यंत्रणेच्याच काही गुप्तचरांनी दिली होती. आता हेच साम्यवादी पुरोगामी पत्रकार राष्ट्रहिताची पत्रकारिता करणार्‍यांना ‘गोदी मिडिया’ असे संबोधत आहेत. यावरून अलगदपणे भारताशी सर्व स्तरांवर उघडपणे शत्रूत्व घेणार्‍या चीनच्या कुशीत जाऊन पत्रकारिता करत असल्याचे उघड झाले आहे. या तथाकथित पुरोगामी पत्रकारांवर ‘ईडी’ने धाड घालून ‘न्यूजक्लिक’चे संपादक प्रबिर पूरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटकही केली आहे. अन्य ४६ जणांची नावे चौकशीच्या फेर्‍यात आहेत. आतापर्यंतचा अनुभव आहे की, ‘ईडी’ने केलेली चौकशी ही पुराव्यानिशी असते आणि तिच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला सहजासहजी सुटत नाही. या वेळी पहिल्यांदाच देशद्रोही पत्रकार उघड झाले आहेत आणि त्यांचे खरे स्वरूप पुरोगाम्यांना आवडणार्‍या ‘न्यूयॉर्क टाइम्स’नेच केला होता.

श्री. रमेश शिंदे

२. चीनधार्जिणे लिखाण करणारे साम्यवादी विचारांचे पत्रकार !

मूळचा भारतीय असणारा आणि सध्या चीनचा मोठे व्यक्तीमत्त्व बनलेला अमेरिकन उद्योजक नवीन रॉय सिंघम हा चीनमधून स्वतःचा व्यापार चालवत आहे. तो चीनच्या ‘कम्युनिस्ट (साम्यवादी) पार्टी’चा समर्थक आहे आणि योगायोगाने त्यानेच ‘न्यूजक्लिक’च्या पत्रकारांना लाखो रुपयांचे ‘फंडिंग’ (निधी) केलेले आहे. चीन हा प्रत्येक क्षेत्रात भारतविरोधी कारवाया करत असतो. डोकलामसारखी घटना असो किंवा लडाखच्या भागात भारतीय सैनिकांशी केलेली झटापट असो अथवा अरुणाचल प्रदेशमधील ‘स्टेपल व्हिसा’ देणे असो (स्टेपल व्हिसा म्हणजे एखाद्या देशात जाण्यासाठी असणारी अनुमती पारपत्रावर स्टँप न मारता वेगळ्या कागदावर माहिती लिहून त्यावर स्टँप मारून तो कागद पारपत्राला ‘स्टेपल पिन’ मारून जोडणे) किंवा भारताच्या उत्तर भागातील सीमेवरून हिमालयातून पाकिस्तानला जोडणारा महामार्ग काढणे असो, तसेच श्रीलंकेवर दबाव आणून श्रीलंकेच्या बंदरात स्वतःचे गुप्तचर माहिती गोळा करणारे जहाज स्थायिक करणे असो, यातील प्रत्येक घटना भारताच्या सुरक्षेशी संबंधित आहे. अशा वेळी काँग्रेसचे नेते चीनच्या नेत्यांशी खासगी भेटी घेतात आणि पुरोगामी पत्रकार चीनकडून मिळालेल्या पैशांच्या बदल्यात भारतविरोधी अन् चीनच्या हिताची पत्रकारिता करून जागतिक स्तरावर भारताला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र करत असतात. यात ‘न्यूजक्लिक’च्या पत्रकारांनी ‘राफेल’ लढाऊ विमान घोटाळ्याच्या संदर्भात केलेले लिखाण असो किंवा उद्योगपती अदानी यांच्या व्यवसायाच्या विरोधात केलेले लिखाण असो, तसेच देहलीतील शेतकरी आंदोलन, ‘सीएए’चे (नागरिकत्व सुधारणा कायद्याचे) आंदोलन, कोरोना महामारीच्या काळात भारतातील आरोग्य व्यवस्था कशी मागासलेली आहे ? अशा पद्धतीचे लिखाण असो, नेहमीच त्यांचे लिखाण देश आणि भारत सरकार यांच्या विरोधात असते. याउलट जगभरात कोरोनाचा विषाणू पसरवणार्‍या आणि ‘त्या माध्यमातून लाखो लोकांच्या हत्या करणार्‍या चीनने मात्र त्यावर कशी प्रभावीपणे मात केली’, अशा पद्धतीचे चीनधार्जिणे लिखाण या साम्यवादी विचारांचे पत्रकार करत होते.

३. भारत तोडण्याचे षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

वर्ष २००९ मध्ये स्थापन झालेली ‘न्यूजक्लिक’ वर्ष २०१७ पर्यंत आर्थिकदृष्ट्या तोट्यामध्ये असते आणि अचानक चीनच्या लाखो रुपयांच्या आर्थिक साहाय्यानंतर ती चर्चेत येते, यातच काहीतरी काळेबेरे असल्याचे स्पष्ट होते. पत्रकारिता ही निष्पक्ष आणि निर्भीड असायला हवी; मात्र ज्यांनी लेखणीतील शाई चीनसारख्या शत्रूराष्ट्राला विकलेली असेल, त्यांच्याकडून वेगळ्या पत्रकारितेची अपेक्षा संभवत नाही. आज ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीला आव्हान देणारे ‘न्यूजक्लिक’चे पत्रकार जेव्हा अमेरिकेत ‘हिंडेनबर्ग’चा अहवाल उघड झाला, त्या वेळी त्याला डोक्यावर घेऊन नाचत होते, अशा दायित्वशून्य पत्रकारितेमुळे भारताला आणि अदानी समूहाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. भारताचा तोटा झाल्यामुळे निश्चितच चीनसारख्या शत्रूराष्ट्राला आनंद होणार आणि त्यामुळेच ‘न्यूजक्लिक’सारख्या बातमी देणार्‍या संकेतस्थळाने हिंडेनबर्गच्या अहवालाला उचलून धरले.

आज पत्रकार अभिसार शर्मा असो वा ‘न्यूजक्लिक’शी जोडलेला कोणताही पुरोगामी पत्रकार असो त्याला चिनी उद्योजक नवीन रॉय सिंघमकडून लाखो रुपये नेमके कशाच्या बदल्यात मिळाले ? याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे देशद्रोही साम्यवादी पत्रकारांची चौकशी होणे, हा काही पत्रकारितेवरचा आघात म्हणता येणार नाही. आज ना उद्या चौकशीतून खरे काय ते बाहेर येईलच. एकीकडे या साम्यवादी विचारांचे विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापिठामधून ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपये घेऊन भारतविरोधी बातम्या पेरत आहेत, हे भारत तोडण्याचे षड्यंत्र आहे. त्यामुळे या षड्यंत्रात सहभागी असणार्‍यांची चौकशी तर व्हायलाच हवी; मात्र त्यांना न्यायालयापुढे नेऊन कठोर शिक्षा देणे, हेही तितकेच आवश्यक आहे, तेव्हाच पाकिस्तान, चीन यांसारख्या देशांना ‘आपल्याला आता भारतात आश्रय मिळणार नाही’, याची खात्री पटेल.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (९.१०.२०२३)

संपादकीय भूमिका

चीनच्या साहाय्याने साम्यवादी पत्रकारांनी भारताच्या विरोधात रचलेल्या षडयंत्राचे अन्वेषण यंत्रांनी समूळ उच्चाटन करावे , हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !