हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र ही त्रिसूत्री जपणारे ‘सनातन प्रभात’ !

पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या दिवशी उपस्थितांना संबोधित केले. त्या मार्गदर्शनाचा गोषवारा त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमसः परस्तात् ।
तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ॥

– यजुर्वेद, अध्याय ३१, कण्डिका १८

अर्थ : सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अंधाराला नष्ट करणार्‍या त्या महापुरुषाला मी जाणतो. त्याला जाणल्यामुळे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होते. त्याला जाणल्यावाचून मुक्तीचा अन्य कोणताही मार्ग नाही.

श्री. विद्याधर नारगोलकर

वंशीविभूषितकरात् नवनीरदाभात् 
पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् ।
पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् 
कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने ॥

अर्थ : ज्याचे हात बासरीमुळे सुशोभित झाले आहेत, जो काळ्या ढगाप्रमाणे श्यामलवर्णी आहे, ज्याने पितांबर धारण केले आहे, ज्याचे ओठ लाल बिंबीच्या (तोंडलीच्या) फळाप्रमाणे सुंदर आहेत, ज्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रसन्न आहे आणि ज्याचे नेत्र कमलाकृती आहेत, त्या भगवान श्रीकृष्णावाचून (या सृष्टीत) दुसरे कोणतेही तत्त्व मला ठाऊक नाही.

ॐकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः ।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॥

अर्थ : योगीजन बिंदूने संयुक्त अशा ॐकाराचे नेहमी ध्यान करतात. सर्व कामना पूर्ण करणार्‍या आणि मोक्षप्राप्ती करून देणार्‍या त्या ॐकाराला माझा नमस्कार असो.

१. ‘सनातन प्रभात’कडे पहातांना श्रीमद्भगवद्गीतेतील ‘भगवंताचे विश्‍वरूप दर्शन’ आठवणे !

आज ‘सनातन प्रभात’कडे पाहिले, म्हणजे सिंहावलोकन केले, याचाच अर्थ सिंह ४ पावले पुढे गेला की, मागे वळून बघतो, तसे जाणवते. त्याचप्रमाणे ‘सनातन प्रभात’कडे पहातांना मला श्रीमद्भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायातील विश्‍वरूप दर्शनमधील खालील श्‍लोक आठवतात.

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्‍लोक १०

अर्थ : अनेक तोंडे आणि डोळे असलेले, आश्‍चर्यकारक रूप असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळ दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या.

दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्‍चर्यमयं देवमनन्तं विश्‍वतोमुखम् ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्‍लोक ११

अर्थ : दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्‍चर्यांनी युक्त, अनंतस्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराटस्वरूप परम देव परमेश्‍वराला अर्जुनाने पाहिले.

२. ‘सनातन प्रभात’चे अलंकार

सनातनचे अलंकार, म्हणजे साधना, नामजप, क्रांतीकारकांच्या विचारांचे स्मरण, परंपरा, इष्ट धर्माचे आचरण, देहावरील अलंकारांचे महत्त्व, शास्त्र, विधी कर्तव्ये, आपले सण, मी पण सोडून देणे. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

मीपणें मैत्री तुटे । मीपणें प्रीति आटे 
मीपणें लिगटे । अभिमान अंगीं ॥

– दासबोध, दशक ७, समास ७, ओवी ४८

अर्थ : मीपणाने मैत्री तुटते. प्रीतीला ओहोटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिकटून बसतो.

३. ‘सनातन प्रभात’चे हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांविषयीचे अनमोल कार्य

‘सनातन प्रभात’ची शस्त्रे, म्हणजे भारतासमोरील भीषण समस्या, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, गडांवर आक्रमणे आणि त्यांची दुरवस्था, राष्ट्रातील हिंसाचार (बातम्या देणे, त्यावरील उपाय आणि संपादकीय मत कंसात देणे) देशद्रोही संघटनांच्या बातम्या देणे; साहित्य, कला, ज्ञान यांवरील आक्रमणांचा निषेध करणे आणि न्याय मार्गाने त्यांचे खंडण करून विजय मिळवणे, उदा. हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन, डॉ. झाकीर नाईक. हिंदु परंपरांच्या विरोधातील प्रदर्शने, चित्रपट, मेळावे यांना प्राणपणाने विरोध करणे.

हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र ही त्रिसूत्री ‘सनातन प्रभात’ कायम जपते. जगात कुठेही हिंदूंवर झालेल्या आक्रमणाची नोंद घेणे आणि उपाय सांगणे, हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होणार्‍या समांतर आर्थिक योजनेविषयी जागृती करणे, मंदिरांचे सरकारीकरण, इतिहासाचे विद्रुपीकरण यांविरोधात आवाज उठवणे, हे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे.

४. राजधर्म आणि राष्ट्रधर्म

धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, कला, क्रीडा, शिक्षण ही हिंदु संस्कृतीची ८ अंगे आहेत. राष्ट्रकारण म्हणजे राजधर्म ! समर्थ सांगतात, ‘‘रायाने करावा राजधर्म । क्षात्रे करावा क्षात्रधर्म । ब्राह्मणे करावा स्वधर्म नाना प्रकारे ॥ श्रीराम ॥’’

हा राजधर्म महर्षि वसिष्ठ आणि विश्‍वामित्र यांनी प्रभु रामचंद्रांना उपदेशला, आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला, विद्यारण्य स्वामींनी हरिहर बुक्क यांना शिकवला.

देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । 
मुलुख बडवावा की बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥

अर्थ : धर्मरक्षणासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी देवाला श्रेेष्ठ मानून त्याचा जयजयकार करावा अन् संपूर्ण प्रांत पिंजून काढावा.

देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते । 
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशय नाहीं ॥

अर्थ : देशाशी द्रोह करणारा पशू आहे. त्याला हुसकून लावावा. देवाचा दासच या जगात यशस्वी होतो, यात शंका नाही.

हा उपदेश समर्थांनी छत्रपती शिवरायांना उपदेशला. भगवान श्रीकृष्णाचा राजधर्म कळला तो छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अन् आता ‘सनातन प्रभात’च्या रूपाने प.पू. डॉ. आठवले हाच राष्ट्रधर्म संदेश आपल्याला उपदेशत आहेत.

५. ‘सनातन प्रभात’ हा मार्गदर्शन करणारा दिवा

‘सनातन प्रभात’ हा घराच्या उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आहे. त्याचा प्रकाश घरात आणि बाहेरही पडतो. घरात कुणाला घ्यायचे ? आणि घरातून कुणाला बाहेर काढायचे ? याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’ करतो.

६. मुसलमान आणि हिंदु यांतील भेद

ओवैसी म्हणतो, ‘‘हिंदु मंदिरात जातो, तसा मुसलमान मशिदीत जातो. पंतप्रधान हिंदु असून ते मंदिरात जातात आणि मी मुसलमान असून मी मशिदीत जातो.’’

आमचा प्रश्‍न जाण्याचा नाही, तर बाहेर येण्याचा आहे. मी बाहेर येतांना प्रसाद म्हणून साखर, बदाम, पिस्ते असलेला शिरा साजूक तुपात करून प्रसाद म्हणून आणतो; पण तुम्ही बाहेर येता, तेव्हा हातात दगड, लोखंडी खांब आणि बाँब असतात, हा भेद आहे.

७. हिंदूंच्या अत्याचारावर वैध मार्गाने प्रतिशोध घेण्याविषयी सांगणारे ‘सनातन प्रभात’ !

सिंहाचा छावा हत्तीचे गंडस्थळ फोडण्याची मनीषा बाळगतो. माझे चिंतन आहे की, महाभारतात आंबा, अंबालिका, अंबिका यांच्यापैकी अंबेला भीष्मांनी नाकारले. तिने त्याचा प्रतिशोध शिखंडीच्या रूपाने घेतला. त्याचप्रमाणे देशाच्या फाळणीच्या वेळी निरपराध हिंदू मारले गेले, त्याचा वैध मार्गाने प्रतिशोध घेण्याविषयी ‘सनातन प्रभात’ सांगत आहे.

८. राष्ट्रजागृतीसाठी प्रतिदिन कार्य करणे आवश्यक असणे

लेखाच्या शेवटी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा चिंतन करणारा विचार उच्चारतो, ‘आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रवाद जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषण करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे एवढेच करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.’

९. अंतर्बाह्य शत्रू असणारा भारत !

इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्हीही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश भारत आहे. असे असणे, हे भारतियांना लज्जास्पद आहे.

शेवटी मला एक गीत आठवते, 
‘नजर हमारी मंजील पर है । दिल मे खुशी की मस्त लहर है ।
लाख लुभाऐ मेहल पराये । अपना घर ही अपना घर है । आ अब लौट चले हम ।’’

॥ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ॥

– श्री. विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे.