मानधनवाढीच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षकांचे आमरण उपोषण मागे !

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !

नवी मुंबई, ५ सप्टेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत रात्री झालेल्या बैठकीमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत ठोक मानधनावरील शिक्षकांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ठरले. त्यानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट यांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ठोक मानधनावरील शिक्षकांनी त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले.

१. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिका, मदतनीस, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांनी ठोक मानधनामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी सीबीडी येथील महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोर ४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते.

२. प्राथमिक शिक्षकांना २० सहस्र रुपये, माध्यमिक शिक्षकांना २५ सहस्र, बालवाडी शिक्षकांना १५ सहस्र, मदतनीस यांना १२ सहस्र ठोक मानधन आहे. महानगरपालिकेने नवीन चालू केलेल्या सी.बी.एस्.सी. शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांतील शिक्षकांना अनुक्रमे ३५ सहस्र आणि २७ सहस्र रुपये वेतन दिले जाते; मात्र १२ वर्षांपासून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना तुटपुंजे वेतन आहे.

संपादकीय भूमिका 

शिक्षकांना आमरण उपोषण करावे लागणे दुर्दैवी !