गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

अल्प धोका असलेले धबधबे नागरिकांसाठी खुले !

पणजी, १९ जुलै (वार्ता.) – राज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती. त्यानंतर आता अभयारण्यातील अल्प धोका असलेले १४ धबधबे नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. या संदर्भात सार्वजनिक नोटिसीद्वारे धबधब्यांची सूची तेथे जाण्यासाठीच्या अटी घोषित करण्यात आल्या आहेत. १४ पैकी ११ धबधबे सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यातील आहेत.

म्हादई अभयारण्यातील पाळी, हिंवरे, चरावणे, गोळावली, गुंगुळडें, चिदंबरम्, नानेली, उकईची खडी-कुमठळ, कुमठळ, मडीयादी-गुळुले आणि खडी-गुळुले या ठिकाणचे धबधबे, त्याचप्रमाणे भगवान महावीर अभयारण्यातील मइदा-कुळे येथील, नेत्रावळी अभयारण्यातील भाटी-नेत्रावळी येथील आणि खोतीगाव अभयारण्यातील कुस्के-खोतीगाव येथील धबधब्यांवर नागरिकांना जाण्यास मुभा आहे.