यमुना नदीला आलेल्या पुरामुळे देहलीत सर्वत्र पाणी !

सर्वोच्च न्यायालय, लाल किल्ला आणि राजघाट यांच्याजवळ साचले पाणी !

नवी देहली – हरियाणातील हथनीकुंड धरणातून सातत्याने सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे यमुना नदीला पूर आला आहे. १३ जुलैला तर पाण्याने २०८.६६ मीटरची पातळी गाठली होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले होते. यासह लाल किल्ला आणि राज घाट येथेही पाणी साचले आहे. ‘आयएसबीटी ’पासून कश्मिरी गेट या परिसरात तब्बल २० फुटांपर्यंत पाणी साचले होते.

१. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ तुकड्या साहाय्यकार्य करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

२. २ सहस्र ७०० साहाय्य छावण्या उभारण्यात आल्या असून १४ जुलैच्या सायंकाळपर्यंत २३ सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले.

३. देहलीतील ६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे तीन जलशुद्धीकरण केंद्रे बंद करावी लागल्याने पुढील एक-दोन दिवस राजधानीला २५ टक्के अल्प पाणी मिळेल.

४. राजधानीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये १६ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असून सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.