राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी शैक्षणिक सशक्‍तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे ! – अन्‍नपूर्णादेवी, केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री

परिषदेचे उद़्‍घाटन करताना केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री श्रीमती अन्‍नपूर्णादेवी आणि अन्य मान्यवर

पुणे – जी-२० शिक्षण कार्यगटाच्‍या बैठकीच्‍या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्‍याशास्‍त्र’ या विषयावर दोन दिवसांच्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद़्‍घाटन केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री श्रीमती अन्‍नपूर्णादेवी यांनी केले. ‘राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी शैक्षणिक सशक्‍तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे’, असे मत त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केले. ‘नागरिक जितके सक्षम होतील, तेवढे राष्‍ट्र अधिक सशक्‍त होईल’, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

या परिषदेला राज्‍याचे उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भारत सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, शिक्षणतज्ञ आणि अभिनेते चित्रपट निर्माते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, केंद्रशासनाच्‍या शिक्षण विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी, राज्‍य केंद्रशासित प्रदेशांच्‍या शिक्षण विभागाचे सचिव आदी उपस्‍थित होते.

केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री अन्‍नपूर्णादेवी पुढे म्‍हणाल्‍या की, भारत सरकार मूलभूत शिक्षण आणि संख्‍याज्ञान कौशल्‍य विकास याला महत्त्व देत आहे. ‘जी-२०’चे एक उद्दिष्‍ट हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि कौशल्‍यांमधील तफावत अल्‍प करणे असे आहे. त्‍यामुळे या दृष्‍टीने या परिषदेमध्‍ये चर्चा होईल. बालकांची शिक्षण क्षमता विकसित करणे, त्‍यांचे संख्‍याज्ञान समज विकसित करण्‍यासाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता, तसेच संख्‍याशास्‍त्र या परिषदेचे केंद्रबिंदू आहेत. राष्‍ट्र निर्माणामध्‍ये शिक्षणाच्‍या योगदानाचे अवलोकन करण्‍याची संधी आहे. त्‍याने नागरिकांसमवेतच राष्‍ट्रही सक्षम आणि सशक्‍त होईल. शैक्षणिक विकासात आपण पुढे गेल्‍यास खर्‍या अर्थाने विकसित राष्‍ट्र बनवू. त्‍या दृष्‍टीने भारत सरकार प्रयत्नशील आहे.

परिषदेच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर यांनीही त्‍यांचे विचार व्‍यक्‍त केले. या परिषदेमध्‍ये श्री. संजय कुमार यांनी भारत सरकारच्‍या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.