गेल्या ४ मासांत मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३२५ बलात्कारांच्या घटनांची नोंद !

(प्रतिकात्मक चित्र)

नागपूर – गेल्या ४ मासांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये मुंबईत सर्वाधिक घटना झाल्याची नोंद आहे. ४ मासांत मुंबईत ३२५, तर पुण्यात ८९ बलात्काराच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे अहवालातून समोर आली आहे. मुंबईत जानेवारीत ७८, फेब्रुवारीत ६० आणि एप्रिल मध्ये ७९ गुन्हे नोंद झाले आहेत. पुणे शहरात जानेवारीत २८, फेब्रुवारीत २४, मार्चमध्ये १३ आणि एप्रिलमध्ये २४ गुन्हे नोंद झाले.

नागपूर येथे गेल्या साडेचार मासांत बलात्कारांचे ८५ गुन्हे नोंद झाले. यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचा क्रमांक लागतो. आरोपींमध्ये सर्वाधिक प्रकरणांमध्ये प्रियकर आणि नातेवाईक हेच आरोपी असल्याचे लक्षात आले आहे. अनेकदा लग्नाचे आमीष दाखवून किंवा जवळचे नातेवाईकच महिलांशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवतात. संबंध बिघडल्यानंतर किंवा कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर बलात्कार झाल्याची तक्रार दिली जाते. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी म्हटले आहे की,  महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या संदर्भात विशेष समिती स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार आहे. पोलिसांनी अशा घटनांविषयी गांभीर्य दाखवायला हवे.

संपादकीय भूमिका

समाजाची नैतिकता ढासळल्याच्या आणि समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता अनिवार्य असल्याचे लक्षात आणून देणार्‍या घटना !