भारतीय पुरातत्व विभागाकडून रायगडाच्या संवर्धनाचे काम संथगतीने चालू !

रायगड

रायगड – रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असला, तरी भारतीय पुरातत्व विभागाकडून गडाचे जतन आणि संवर्धन यांचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. १९ पैकी केवळ २ कामेच विभागाने पूर्ण केली आहेत, तर साडे आठ कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे. (या निधीच्या वापराचे सुनियोजन कसे करणार, याविषयी विभागाने सांगावे. शिवप्रेमींनो, रायगडाचे लवकरात लवकर संवर्धन होण्यासाठी पुरातत्व विभागाचा पाठपुरावा घ्या ! – संपादक)

१. रायगडाचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्य सरकारने ६५० कोटी रुपयांचा निधी संमत केला होता. विकासाच्या अंतर्गत रायगड प्राधिकरणाची स्थापनाही करण्यात आली. रायगडसाठी बांधकाम विभागाचे विशेष स्थापत्य पथक नेमण्यात आले; पण तरीही कामांमध्ये गती आली नाही.

२. पावसाळ्यात रायगड खोर्‍यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्या कालावधीत कामे करणे शक्य होत नाही. रायगडावर यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. २ ते ६ जून या काळात तेथे तिथी आणि दिनांक यांनुसार सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वी गड संवर्धनाची कामे नेटाने गती देऊन पूणर्र् करणे आवश्यक असणार आहे.

गडसंवर्धनाच्या कामाचा वेग वाढायला हवा ! – डॉ. अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक

गडावर झालेल्या उत्खननात काय सापडले, याचा अहवाल पुरातत्व विभागाने प्रसिद्ध करायला हवा; म्हणजे त्याचा लाभ इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांना होऊ शकेल. अद्याप एकही अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. गडसंवर्धनाच्या कामाचा वेग वाढायला हवा.

संपादकीय भूमिका

  • रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी संमत होऊनही कामात असा वेळकाढूपणा का केला जातो ? पुरातत्व विभागात अशा कर्तव्यचुकार अधिकार्‍यांचा भरणा असल्यामुळे हा विभाग विसर्जित करून संबंधितांना कठोर शिक्षाच करायला हवी !