९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे होणार !

नागपूर – ९७ वे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पुणे येथील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जिल्हा सांगली); खानदेशातील जळगाव जिल्ह्याती अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना यांचा प्रस्ताव होता. यांतून अमळनेर गावाची निवड करण्यात आली. २ मासांपूर्वी वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.
‘साने गुरुजी शाळेत शिकवत असतांना ‘विद्यार्थी’ नावाचे एक मासिक प्रकाशित केले होते. ते विद्यार्थ्यांमध्ये पुष्कळ लोकप्रिय झाले. त्यांच्या वाङ्मयीन कर्मभूमीत हे संमेलन ५०च्या दशकानंतर प्रथमच होत आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. त्यामुळे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दायित्व पेलायला सक्षम आहे. संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असे अमळनेर, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.