मुंबई-गोवा मार्गावरील हातीवले (राजापूर) येथील टोलवसुली पुन्हा बंद !

रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका ११ एप्रिल या दिवशी चालू करण्यात आला होता; मात्र  स्थानिक ग्रामस्थांनी या टोलनाक्याला जोरदार विरोध केल्यानंतर १२ एप्रिलला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘या टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करत आहोत. जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांचे समाधान होत नाही, तोपर्यंत टोलवसुली होऊ होणार नाही’, अशी माहिती येथील पत्रकार परिषदेत दिली.

 उदय सामंत

११ एप्रिलपासून हातीवले येथे टोलनाका चालू करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर टोलवसुली करण्यास मान्यता दिली होती. २२ डिसेंबर २०२२ मध्ये माजी खासदार नीलेश राणे आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी हा टोलनाका चालू करण्यास विरोध केला होता. त्या वेळी त्यांनी ‘महामार्गाचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोलवसुली करू देणार नाही’, अशी भूमिका घेतली होती. आता मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानंतर हातिवले येथील टोल वसुली बंद करण्यात आली आहे.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, आता टोलनाक्यावर देण्यात आलेले पोलीस संरक्षणही हटवण्यात आले आहे. उर्वरित काम अपूर्ण असलेल्या ११ किलोमीटर मार्गावरील स्थानिक वाहतूकदारांच्या समस्या सोडवल्याशिवाय टोलवसुली करू नये, तसेच या महामार्गाजवळ स्थानिक भागातून काढण्यात येणार्‍या चीर्‍यांचीसुद्धा वाहतूकही केली जाते. या गाड्यांसाठी सवलतीचा दर निश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.