हिवाळी अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांची ‘लक्षवेधी’ कामगिरी !

विधानसभेत ३०, तर विधान परिषदेत ७ लक्षवेधी सूचनांना दिली उत्तरे

उद्योगमंत्री श्री. उदय सामंत

रत्नागिरी – महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत पार पडले. या अधिवेशनात उद्योगमंत्री, तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधींची विक्रमी कामगिरी केल्याची माहिती मंत्री सामंत यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. सभागृहात कामकाजाच्या वेळी त्यांना सहकार्य करणार्‍या सर्व सहकार्‍यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत १०६, तर विधान परिषदेत ४३ लक्षवेधी मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री सामंत यांनी विधानसभेत ३०, तर विधान परिषदेत ७ लक्षवेधी सूचनांना उत्तरे दिली होती.

शिंदे-फडणवीस सरकारमधील एक तरुण मंत्री म्हणून त्यांना दिलेले दायित्व त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या कामगिरीविषयी गौरवोद्गार काढले जात आहेत.

संपादकीय भूमिका

गडबड-गोंधळ करून कामकाज स्थगित करायला लावणारे लोकप्रतिनिधी ‘लक्षवेधी’ कामगिरीकडे कधी लक्ष देणार ?