पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाविषयी सर्वाेच्च न्यायालयात उद्या सुनावणी !

मुंबई – पालघर जिल्ह्यातील गडचिंचाळे गावात एप्रिल २०२० मध्ये जमावाने आक्रमण करून २ साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक यांची हत्या केली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १५ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने नुकतीच केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला या प्रकरणाच्या अन्वेषणाला अनुमती दिली आहे. श्री पंच दशबन जुना आखाडाचे साधू, मृत साधूंचे नातेवाईक, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि शशांक शेखर यांनीही न्यायालयात याचिका करून या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. या आक्रमणात कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज आणि मुंबईच्या कांदिवली येथील नीलेश तेलगडे यांची जमावाने पोलिसांच्या उपस्थितीत निर्घृण हत्या केली होती.