भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा ! – महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

नाशिक – भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, संविधान म्हणजे सम-विधान, अर्थात् प्रत्येकाला समानतेचा अधिकार; पण भारत स्वतंत्र झाल्यापासून जातीयवाद वाढला आहे. धर्मशास्त्रात कुठेही जातीचा उल्लेख नाही. लोकशाहीचा मूळ आधार हा समानतेचा अधिकार आहे; परंतु आज जातीच्या आधारे आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण आणि समान नागरी कायदा यांची पुष्कळ आवश्यकता आहे. आज अनेक मंदिरे, हिंदूंची धार्मिक स्थळे सरकारच्या कह्यात आहेत. अनेक प्रशासकीय अधिकारी त्या संस्थेचे अध्यक्ष असतात; परंतु कोणतेही चर्च-मशीद सरकारच्या कह्यात नाही आणि कोणतेही प्रशासकीय अधिकारी या संस्थांवर कार्यरत नाहीत. हा भेदभाव का ? अशी अनेक उदाहरणे  देता येतील. त्यामुळे लवकरात लवकर भारतात आर्थिक निकषावर समान नागरी कायदा लागू करावा, ही नम्र विनंती. आपण घेतलेला निर्णय पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना !