शिवमोग्गा (कर्नाटक) येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फलक काढून टिपू सुलतान याचा फलक लावण्यावरून वाद

  • धर्मांधांकडून दोघा हिंदु तरुणांवर चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण

  • शिवमोग्गामध्ये जमावबंदी लागू  

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथे स्वातंत्र्यदिनी, म्हणजे १५ ऑगस्टला येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लावण्यात आलेला फलक काढून तेथे टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक लावण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी दोघा हिंदु तरुणांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यानंतर धर्मांध पसार झाले. यात प्रेम सिंग (वय २० वर्षे) आणि प्रवीण (वय २७ वर्षे) हे गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेनंतर पोलिसांनी शहरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्याच्यावर पायावर गोळीबार केला. यात तो घायाळ झाला. अटक केलेल्यांपैकी दोघांची ओळख पटली असून नदीम (वय २५ वर्षे) आणि अब्दुल रहमान (वय २५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांना घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

१. शहरातील अमीर अहमद सर्कल येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा  फलक लावला होता. काही वेळाने टिपू सुलतानचा फलक घेऊन काही धर्मांध तरुण तेथे पोचले. या तरुणांनी सावरकरांचा फलक काढण्याचा प्रयत्न केला. यावरून हिंदु आणि धर्मांध तरुण यांच्यात जोरदार वादावादी झाला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी प्रथम लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यानंतर चौकाचौकांत असलेले सावरकरांचे फलक हटवले.

२. सावरकरांचे फलक हटवल्याच्या निषेधार्थ हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन चालू केले. परिसरातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शिवमोग्गा शहरात कलम १४४ (जमावबंदी) तत्काळ लागू करून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यासह मंगळुरूच्या सुरतकल क्रॉसरोडला सावरकरांचे नाव देणारे फलकही पोलिसांनी हटवले आहेत. यानंतर काही अंतरावर धर्मांधांनी प्रेमसिंग आणि प्रवीण यांच्यावर आक्रमण केले.

जर हिंदु जागा झाला, तर पुन्हा अशी घटना घडणार नाही ! – भाजपचे स्थानिक आमदार ईश्‍वरप्पा

‘दुकान बंद करतांना एका हिंदु तरुणाला या लोकांनी (धर्मांधांनी) चाकूने मारले. यामुळे शिवमोग्गातील नागरिकांत संताप आहे. त्यांच्या समाजातील ज्येष्ठ लोकांना आवाहन करतो की, तुमचे तरुण राष्ट्रद्रोही काम करत आहेत. त्यावर तुम्ही बोलले पाहिजे अन्यथा हिंदु समाज आणि पोलीस विभाग यांना ठाऊक आहे की, त्यांना कसा धडा शिकवला पाहिजे अन् प्रसंगी तो आम्ही शिकवू. हिंदु समाज जागृत झाला, तर राष्ट्रविरोधी कारवाया होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, सर्वांनी शांततेच रहावे. हिंदु आणि मुसलमान यांनी शांततेत रहावे आणि आम्ही त्यांचे पालन करत आहोत; मात्र गुंडगिरी कोण करत आहे ? त्यांचे काय करायला हवे, ते पोलीस करतील’, अशी प्रतिक्रिया शिवमोग्गा येथील भाजपचे आमदार आणि माजी मंत्री ईश्‍वरप्पा यांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

  • राज्यात गेल्या काही मासांत हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. गेल्या २ दिवसांपासून येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या फलकांवरून वाद चालू असतांना पोलिसांनी याकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता होती. असे केले असते, तर हिंदूंवर आक्रमण झाले नसते. राज्यात भाजपचे सरकार असतांना असा निष्काळजीपणा होऊ नये, असे हिंदूंना वाटते !
  • कर्नाटकात टिपू सुलतान यांच्या वंशजांवर वचक निर्माण करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !