बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

  • जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘टार्गेटेड किलिंग’ (लक्ष्य करून हत्या) !

  • कलम ३७० रहित झाल्यापासून हिंसाचारात वाढ !

श्रीनगर – जिहादी आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे १२ ऑगस्टच्या पहाटे एका बिहारी मजुरावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. महंमद अमरेज असे त्याचे नाव असून तो बिहारच्या माधेपुरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. या घटनेनंतर अन्वेषण चालू केले आहे. आतंकवाद्यांनी अमरेज झोपेत असतांना त्याच्यावर गोळीबार केला, असे त्याच्या भावाने सांगितले. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच संसदेत, ‘जम्मू काश्मीरमध्ये वर्ष २०१७ पासून ते ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू-काश्मीर राज्याबाहेरील २८  कामगारांची हत्या करण्यात आली’, अशी माहिती दिली होती.

१. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरवण्यासाठी ‘टार्गेटेड किलिंग’चे साहाय्य घेत आहे. कलम ३७० रहित झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात येणार्‍या भारत सरकारच्या विविध योजनांवर पाणी फेरण्यासाठी या हत्या केल्या जात आहेत.

२. ‘टार्गेटेड किलिंग’च्या माध्यमातून आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदू, तसेच परप्रांतीय कामगार यांच्यासह भारताप्रती मवाळ धोरण असणारे स्थानिक मुसलमान प्रशासकीय अधिकारी अन् पोलीस कर्मचारी यांना लक्ष्य केले आहे.

३. ‘बाहेरून येणारे स्थलांतरित कामगार काश्मिरी मुसलमानांच्या नोकर्‍या आणि भूमी बळकावतील’, असा अपप्रचार ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून केला जात आहे. याद्वारे पाकिस्तान हा आतंकवादी संघटनांसाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

संपादकीय भूमिका

कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !