अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या अवमानाची काळजी न करता काम करावे ! – त्रिपुराचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब

बिप्लब कुमार देब

आगरतळा (त्रिपुरा) – मला अनेक अधिकारी सांगतात की, ‘न्यायालयाचा अवमान होईल’, या भीतीमुळे ते एखादे काम करू शकत नाहीत. अशी भीती कशाला ? न्यायालय निर्णय देण्याचे काम करते; पण पोलीस त्याची कार्यवाही करतात आणि पोलीस माझ्या नियंत्रणात आहेत. आतापर्यंत न्यायालयाचा अवमान केल्याने किती लोकांना कारागृहात टाकण्यात आले ? न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणात तुम्ही कारागृहात जाण्यापूर्वी मी जाईन. कुणाला कारागृहात टाकणे सोपे नसते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांचे काम लक्षात ठेवले जाते. जर न्यायालय पोलिसांना एखाद्या व्यक्तीला कारागृहात टाकण्यास सांगत असेल, तर ‘आरोपी सापडलाच नाही’, असे पोलिसांनी सांगावे. शेवटी शक्ती तर बापाच्या हातात असते ना ?, अशी विधाने त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केली. या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. ‘मुख्यमंत्री स्वतः न्यायपालिकेचा अपमान कसे करू शकतात ?’, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले की, देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे. त्यांनी सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे. न्यायालयाप्रती आणि न्यायव्यवस्थेप्रती गंभीर अनादर दाखवणार्‍या देब यांच्या वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का? , असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.