वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा करा, न थकता काम करा !

पंतप्रधान मोदी यांचा नवीन मंत्र्यांना सल्ला !

नवी देहली – वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थकता काम करा, अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांना सांगितली. या सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मोदी यांनी नवीन मंत्र्यांना त्यांनी यापूर्वी त्यांच्या खात्याच्या पूर्वीच्या मंत्र्यांना भेटून त्यांचा सल्ला घेण्यास सांगितले. ‘माजी मंत्र्यांच्या अनुभवाचा अधिकाधिक लाभ करून घेण्यासाठी ही भेट घ्यावी’, असे मोदी यांनी म्हटले.

मोदी म्हणाले की, नवीन मंत्र्यांनी भरपूर श्रम घ्यावे आणि लोकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी शासनाच्या अधिकाधिक योजना त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात, यासाठी कार्यशील रहावे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै या दिवशी चालू होत आहे. त्यामुळे नव्या मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयांतर्गत विषयांचा अभ्यास करावा, अशी सूचनाही मोदी यांनी केली.