नामजप आणि स्वभावदोष-निर्मूलन यांमुळे व्यक्तीला आनंदप्राप्ती होते ! – मिलुटीन पांक्रात्स, क्रोएशिया

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क यांनी लिहिलेला ‘मन:शांती’ या विषयावरील शोधनिबंध सादर !

मुंबई – प्रत्येक व्यक्ती आनंद आणि मन:शांती यांच्या शोधात असते; परंतु जीवनातील विविध समस्यांचा सामना करतांना ती आनंद आणि मन:शांती हरवून बसते. उतारवयात शारीरिक दुखण्यांच्या जोडीला व्यक्तीला विविध प्रकारच्या भयांनाही सामोरे जावे लागते. व्यक्तीने नामजप केल्यास आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्यास सर्वाेच्च अन् कायमस्वरूपी टिकणारे सुख, म्हणजेच आनंद, तसेच मन:शांती यांची प्राप्ती होऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. मिलुटीन  पांक्रात्स यांनी केले. ते २८ मे २०२१ या दिवशी लिस्बन, पोर्तुगाल येथे ७ व्या ‘युरोपियन कॉन्फरन्स ऑन रिलिजन, स्पिरिच्युॲलिटी अँड हेल्थ एजिंग, स्पिरिच्युॲलिटी अँड हेल्थ’ या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते.

श्री. मिलुटीन पांक्रात्स

या परिषदेचे आयोजन ‘युरोपियन इनिशिएटीव्ह ऑन रिलिजन, स्पिरिच्युॲलिटी अँड हेल्थ अँड द कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ पोर्तुगाल’ यांनी केले होते. श्री. मिलुटीन पांक्रात्स यांनी या परिषदेत ‘उतारवयातील व्यक्तींना मन:शांती मिळवण्यासाठी साहाय्य’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे (‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे) संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

जीवनातील समस्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी ३ मूलभूत कारणे !

श्री. मिलुटीन पांक्रात्स पुढे म्हणाले की, जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी होतो. परिणामस्वरूप स्वतःची मनःशांती आणि सुख यांवर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या जीवनातील समस्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी ३ मूलभूत कारणे असतात. जीवनातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक समस्या आध्यात्मिक कारणांमुळे असतात; परंतु त्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांच्या स्वरूपात प्रकट होऊ शकतात. ही आकडेवारी आध्यात्मिक संशोधनातून प्राप्त झाली आहे. प्रारब्ध, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती ही ३ प्रमुख आध्यात्मिक कारणे होत. समस्येच्या निवारणासाठी समस्येच्या कारणाच्या स्तरानुसार उपाय करावा लागतो. जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा उपाययोजनाही आध्यात्मिकच करणे आवश्यक असते. नामजपादी उपायांमुळे शारीरिक आणि मानसिक समस्या सुटण्यास साहाय्य होते, विशेषतः जेव्हा या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून आतापर्यंत १५ राष्ट्रीय आणि ५४ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ७१ वा शोधनिबंध होता. याआधी १५ राष्ट्रीय आणि ५४ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यांपैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना सर्वाेत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाला आहे.