आपत्काळात ‘जसे व्हायचे असेल, तसे होईल’, अशी मानसिकता नको !

आपत्काळाविषयी गांभीर्य निर्माण होण्याच्या दृष्टीने काही जणांना सांगितले की, ते म्हणतात, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल तेच आमचेही होईल. आपत्काळात जसे व्हायचे असेल, तसे होईल. पुढचे पुढे बघू.’ यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. आपत्काळात ‘जे व्हायचे आहे ते’, म्हणजे विनाश हा होणारच आहे.

घरामध्ये वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलेही असतात. वयोवृद्ध मंडळी परावलंबी अन् असाहाय्य असतात, तर मुले अजाण असतात. त्यांना सांभाळण्याचे आणि त्यांच्या रक्षणाचे दायित्व (जबाबदारी) कुटुंबातील कर्त्या मंडळींचे असते. कुटुंबातील कर्त्या मंडळींनी जर आपत्काळाच्या सिद्धतेकडे दुर्लक्ष केले, तर पुढे जो आपत्काळाचा वणवा पेटेल, त्याच्यात वयोवृद्ध आणि लहान मुलेही होरपळली जातील. याचे पातक कुटुंबातील कर्त्या मंडळींना निश्‍चितच लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे.