परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडूनडॉ. रूपाली  भाटकार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मला जर कुणी विचारले, ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंददायी क्षण कोणता ?’, तर त्याचे उत्तर असेल, ‘वर्ष १९९२ मध्ये झालेली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची भेट !’ हा अविस्मरणीय क्षण माझ्या हृदयात मी जतन करून ठेवला आहे. मला त्यांचा सत्संग लाभला, यासाठी मी स्वतःला पुष्कळ भाग्यवान समजते. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. आज मी जी काही आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच आहे. मला तर वाटते, ‘या जन्मापासून नव्हे, तर गेल्या अनेक जन्मांपासून ते मला मार्गदर्शन करत आहेत आणि माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहेत. माझे आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक आणि समाजातील लोक यांच्या माध्यमातून तेच माझी काळजी घेत आहेत.’

त्यांच्या असंख्य दैवी गुणांपैकी काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. त्यांच्यातील हे सर्व दैवी गुण मला स्वतःमध्ये आणता आले नसले, तरी या लेखातून साधकांना प्रीतीचा सागर असलेल्या आपल्या गुरूंची महानता समजण्यास साहाय्य होईल.

२५ फेब्रुवारी या दिवशी आपण या लेखातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

२५ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखातील सूत्रे वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/454029.html

डॉ. रूपाली भाटकार

१५. वयोवृद्धांविषयी आदरभाव असणे आणि स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणे

अध्यात्मप्रसारासाठी सर्वत्र भ्रमण करतांना ते वयोवृद्ध लोकांशी अतिशय प्रेमाने आणि आदराने वागत. ‘त्यांना बसायला जागा देणे, त्यांना नमस्कार करणे’, हे ते अगदी सहजतेने, म्हणजे स्वतःच्या आर्थिक आणि आध्यात्मिक दर्जाचा विचार न करता करत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या याच शिकवणीमुळे आज मी माझ्या वृद्ध आईची काळजी घेऊ शकत आहे. ते मला सांगत, ‘‘एक वेळ सेवा झाली नाही, तरी चालेल; परंतु सेवेसाठी तुम्ही आई-वडिलांना सोडू नये.’’ अशा महान गुरूंकडून मिळालेली ही शिकवण आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांची सेवा देवाचे रूप म्हणून करण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी कोणतीच कसर सोडली नाही आणि यातून सर्व साधकांसमोर एक आदर्शच ठेवला आहे.

१६. संत किंवा गुरु यांच्याप्रती आदर असणे

मंदिरातील पुजारी असो अथवा अन्य संघटनेचे गुरु असोत, परात्पर गुरु नेहमीच त्यांच्याशी आदराने वागतात. खरेतर अध्यात्मात परात्पर गुरुदेव एका अत्युच्च स्थितीला आहेत, तरीही ‘ते पुजारी किंवा गुरु आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत’, असाच त्यांचा भाव असतो.

१७. विनम्रता

मी वर्ष १९९२ मध्ये जेव्हापासून परात्पर गुरुदेवांना भेटले आहे, तेव्हापासून त्यांच्यातील हाच गुण प्रकर्षाने पहात आले आहे. ते ‘परात्पर गुरु’ या उच्च पदावर असूनही विनम्र आहेत. त्यांचा रक्तदाब तपासल्यावर ते माझे आभार मानत. खरेतर ती माझी सेवाच आहे; परंतु त्याविषयी त्यांच्यात नम्रता दिसून येते. रक्तदाब मोजतांना परात्पर गुरुदेव स्वतः ते यंत्र हातात धरतात. त्यांच्या सेवेला साधक असूनही खोलीतील पायपुसणी ते स्वतः वाळत घालतात, तसेच स्वतःचे बाहेर वाळत घातलेले कपडे सुकल्यावर खोलीत आणतात. सनातनचा आश्रम त्यांनीच बांधलेला आहे, तरीही ते स्वतः एका शिष्याप्रमाणेच तेथे रहातात.

१८. साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे

प्रत्येक सेवा परात्पर गुरुदेवच साधकांच्या माध्यमातून करत असतात, तरीही सेवा चांगली झाली; म्हणून ते साधकांचे कौतुक करतात. साधकांचे कौतुक करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

१९. इतरांसाठी त्याग करणे

त्यांच्याकडे सदरा-पायजमा यांचे केवळ दोनच जोड आहेत. ते स्वतःसाठी कोणतीच सर्वोत्कृष्ट वस्तू वापरत नाहीत; मात्र ‘साधकांना सर्व सुविधा मिळाव्यात’, याकडे त्यांचे लक्ष असते. एवढेच नाही, तर ते स्वतः साधेच भोजन घेतात, जेणेकरून साधकांचा भोजन बनवण्यातील वेळ वाचू शकेल. सर्वांसाठी बनवलेले भोजनच ते घेतात.

२०. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना साहाय्य करणे

त्यांचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, तरीही ते आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या अडचणी जाणून घेतात, तसेच त्यांनी आध्यत्मिक स्तरावर वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. आणि त्यांच्यासाठी उपायही सांगतात. हा वेळ ते स्वतःच्या झोपेचा त्याग करून भरून काढतात.’ (समाप्त)

– आधुनिक वैद्या रूपाली भाटकार, गोवा (ऑगस्ट २०२०)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

१. ‘साधना झाली नाही; म्हणून त्याविषयी विचार किंवा चिंता करत बसण्याऐवजी त्या क्षणापासून साधना करण्यास आरंभ करा.

२. आध्यात्मिक प्रगती सापशिडीच्या खेळाप्रमाणे असते. जोपर्यंत आपण ईश्‍वराला पूर्णतः शरण जात नाही, तोपर्यंत साधनेत आपली घसरण होतच असते.

३. ‘मला काय साध्य करता आले नाही ? माझ्या आयुष्यात काय काय चुकीचे घडले किंवा भविष्यात माझ्या संदर्भात काय घडेल ?’, याविषयी विचार न करता प्रत्येक क्षण जसा येईल, तसा जगायला हवा.’

– आधुनिक वैद्या रूपाली भाटकार, गोवा