भारतात १ पोलीस कर्मचारी करतो ६४१ लोकांची सुरक्षा !

१ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस !

देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्‍यावर असणे लज्जास्पद !

नवी देहली – भारतात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस आहेत. याचाच अर्थ देशातील ६४१ व्यक्तींची सुरक्षा केवळ १ पोलीस कर्मचारी करत आहे, अशी माहिती  ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०’द्वारे समोर आली आहे. टाटा ट्रस्टकडून हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. बिहारसारख्या राज्यात तर १ लाख लोकांची सुरक्षा ७६ पोलीस करत आहेत.

( प्रतिकात्मक चित्र )

१. या अहावालानुसार, जानेवारी २०२० पर्यंत राष्ट्रीय स्तरावर ३ पोलीस अधिकार्‍यांपैकी १ पद रिकामे आहे. मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये २ पैकी १ पद रिकामे आहे. शिपायांमध्ये ५ पैकी १ पद रिकामे आहे. तेलंगाणा आणि बंगाल या राज्यांत ४० टक्के पोलीसभरती करण्यात आलेली नाही.

२.  गेल्या वर्षी पंजाब आणि महाराष्ट्र पोलीस मानांकनामध्ये मागे पडले आहेत, तर छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांच्या पोलिसांचे मानांकन वाढले आहे. वर्ष २०१९ मध्ये पंजाब पोलीस देशात तिसर्‍या क्रमाकांवर होते, तर वर्ष २०२० मध्ये ते १२ व्या क्रमांकावर गेले आहेत. पोलिसांवरील सरकारी खर्च अल्प झाला आहे, तसेच भरती प्रक्रियाही थांबली आहे.

३. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमाकांवर होता, तो १३ व्या क्रमाकांवर गेला आहे. यात अधिकारी आणि शिपाई यांची संख्या अल्प असणे, हे एक कारण आहे. तसेच महिला पोलिसांची संख्याही अल्प झाली आहे.

४. कर्नाटक राज्याचे पोलीस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याने अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कोट्यातील पोलिसांची भरती पूर्ण केली आहे.