सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

विविध उपासनेसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘समस्त विश्‍वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! हिंदु धर्मात सूर्योपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’, म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच ‘सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे’, असे सुवचन आहे. हिंदूंचा दिवस सूर्योदयापासून चालू होतो आणि संपतोही सूर्यास्तानंतरच; म्हणून आपल्या भारतवर्षातील ऋषिमुनी, सिद्ध महात्मे अन् संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला आहे. सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार केल्याने व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते. ‘सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १६.११.२०२० या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

सूर्याला अर्घ्य देताना ( प्रातिनिधिक छायाचित्र)

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत आध्यात्मिक त्रास (टीप) असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांनी सूर्योदय अन् सूर्यास्त या वेळी सूर्याला अर्घ्य दिल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – सूर्याला अर्घ्य दिल्याचा आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप १ : सूर्योदयापेक्षा (उगवत्या सूर्यापेक्षा) सूर्यास्ताला (मावळतीला) सूर्याचे तेज थोडे न्यून (कमी) होते, त्यामुळे सूर्योदयापेक्षा सूर्यास्ताला अर्घ्य दिल्यावर साधकांतील सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ थोडी अल्प (कमी) आहे.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. सूर्याला अर्घ्य दिल्याने आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा नाहीशा होऊन त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

२. सूर्याला अर्घ्य दिल्याने आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

२. निष्कर्ष

‘सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून सिद्ध झाले.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण 

३ अ. सूर्याला अर्घ्य दिल्याने चाचणीतील साधकांना पुष्कळ चैतन्य मिळणे : सूर्यामध्ये प्रचंड तेज आणि ऊर्जा आहे. सूर्याच्या तेजोमय किरणांमुळे वायूमंडल शुद्ध अन् पवित्र बनते. सूर्याची उपासना केल्याने उपासकाला सूर्याचे चैतन्य मिळते. चाचणीतील साधकांनी सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी सूर्यदेवाला भावपूर्ण अर्घ्य दिल्याने त्यांना सूर्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळाले. यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाली. यातून ‘हिंदु धर्मात सूर्यनारायण आणि सूर्योपासना यांना अनन्यसाधारण महत्त्व का दिले आहे’, ते लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.११.२०२०)

ई-मेल : [email protected]

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक