आहार कसा नसावा आणि कसा असावा ?

१. मांसाहार, तसेच तमोगुणी आहार टाळा !

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.

२. शाकाहार, तसेच सात्त्विक आहार घ्या !

दूध, लोणी, गायीचे तूप, ताक, तांदूळ, गहू, डाळी, पालेभाज्या, फळे यांसारखे किंवा यांपासून बनवलेले सात्त्विक अन्नपदार्थ सेवन करा.

३. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मिताहार करा !

जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.

४. भोजनाची योग्य पद्धत

अ. पाट किंवा आसन घेऊन त्यावर भोजनासाठी बसा. आसंदी-पटलावर किंवा भूमीवर भोजनाला बसणे टाळा.

आ. शक्यतो सर्व कुटुंबियांनी स्वयंपाकघरात किंवा भोजनगृहात एकत्र भोजनाला बसावे. दक्षिणेकडे तोंड करून भोजनास बसणे टाळा.

इ. वाढलेले भोजन प्रथम देवाला अर्पण करा आणि नंतर देवाचा प्रसाद म्हणून ते नामजप करत सेवन करा.

ई. उष्टे अन्न खाऊ नका; कारण त्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो.

उ. ताटात अन्नपदार्थ टाकू नका. जेवण झाल्यावर ताटाभोवती पडलेले अन्नकण पायदळी येऊ नयेत; म्हणून लगेच उचला.

ऊ. ‘अन्नदाता सुखी भव ।’, असे म्हणून आणि उपास्यदेवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पाटावरून उठा.

५. दुपारी जेवणानंतर २४ मिनिटे डाव्या कुशीवर झोपावे. (वामकुक्षी घ्यावी.)

अ. शास्त्र : जेवल्यावर अन्नपचनासाठी जास्त रक्तपुरवठा पोटाच्या आतड्यांकडे, तर अल्प रक्तपुरवठा मेंदूला होतो. या काळात विश्रांती किंवा झोप घ्यावी.