केंद्रशासनाच्या योजनेचा लाभ राज्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेले १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे आहे. महाराष्ट्रात या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ मिळेल, यासाठी राज्यशासन संपूर्ण प्रयत्न करील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. याविषयी राज्यातील यंत्रणेला सूचना देण्यात आली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे विनामूल्य वाटप, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना विनामूल्य गॅस, स्वस्त धान्य दुकानात रास्त भावाने अन्नपुरवठा, शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात २ सहस्र रुपयांची रक्कम, यांसारख्या निर्णयांमुळे जनतेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत रहाण्यास साहाय्य होईल.

२. गरीब, वृद्ध, दिव्यांग, विकलांग, विधवा महिला यांच्या जनधन खात्यांमध्ये १ सहस्र रुपये जमा करण्याचा, मनरेगा कामांवरील मजुरांना प्रतिदिन २०० रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय योग्य आहे.

३. या युद्धात आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यांच्यासाठी विम्याचे कवच देऊन केंद्रशासनाने यंत्रणेत काम करणार्‍यांना बळ दिले आहे. एकीच्या बळावर आपण कोरोना विषाणूला देशातून सीमापार करण्यात नक्कीच यशस्वी होऊ.