बेपत्ता युवतीच्या हत्येच्या कारणावरून वडील आणि भाऊ यांना कारागृहात डांबले !

पोलिसांच्या कृत्याला गृहमंत्र्यांनीच विधानसभेत म्हटले ‘लाजिरवाणे’ !

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या गावात सापडलेल्या एक बेवारस मृतदेह कोणताही आधार नसतांना पोलिसांनी शिवानी कलमेकर नामक बेपत्ता युवतीचा असल्याचे घोषित केले. एवढ्यावरच न थांबता तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचे वडील आणि भाऊ यांना अटक करून कारागृहात डांबले अन् हत्येचा गुन्हा वदवून घेण्यासाठी त्यांना मारहाण केली. बेपत्ता युवती जेव्हा पोलीस ठाण्यात आल्यावर मृतदेह तिचा नसल्याचे सिद्ध झाले आणि पोलिसांनी तिचे वडील आणि भाऊ यांना कारागृहातून सोडले. पोलिसांच्या या कृत्याला स्वत: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘लाजिरवाणे कृत्य’ म्हटले.

७ जुलै या दिवशी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक यांसह अन्य पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ‘पीडित कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीने साहाय्य करण्यात येईल. याविषयीचे विभागीय अन्वेषण ३ मासांत पूर्ण केले जाईल. ज्या पोलिसांचा या प्रकरणाशी थेट संबंध सिद्ध होईल, त्यांना कामावरून निष्कासित करण्यात येईल’, असे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.