पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ४०० वर्षांपूर्वीचा शिवकालीन दगडी रांजण सापडला !

४०० वर्षांपूर्वीचा शिवकालीन दगडी रांजण

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाच्या वेळी सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा शिवकालीन दगडी रांजण सापडला आहे. हा रांजण विठ्ठल भक्त संत माणकोजी बोधले यांनी वर्ष १६४० मध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बसवला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात दुरुस्ती आणि नवीन दगडी फर्शी बसवण्याचे काम चालू आहे. बाजीराव पडसाळी भागात काम चालू असतांना अनुमाने २ टन वजनाचा जुना दगडी रांजण आढळून आला. या रांजणात २०० लिटरपेक्षा अधिक पाणी साठवण्याची क्षमता आहे. पूर्वी भाविकांना पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी याच रांजणातील पाण्याचा वापर केला जात असे. या रांजणाला ‘‘बोधलेबुवांचा रांजण’’ असेही ओळखले जात असे.

पाण्याच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर या रांजणाचा वापर अल्प झाला होता; मात्र तब्बल ४०० वर्षांनंतर हा दुर्मिळ रांजण पुन्हा समोर आल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी तो पहाण्यासाठी गर्दी केली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या दगडी रांजणाची पुनर्स्थापना त्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.