मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्यातील कामे १७ मेपर्यंत पूर्ण करावीत ! – कार्तिकेयन एस्., जिल्हाधिकारी, सोलापूर

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या संख्येत येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याच्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील चालू कामे १७ मेपर्यंत गुणवत्तापूर्ण आणि गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याच्या अंतर्गत चालू असलेल्या कामांच्या आढाव्याविषयीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिले.

जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले, ‘‘बाजीराव पडसाळी येथील व्यंकटेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, कव्हर शेड आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत. कंत्राटदाराने कामाची गती वाढवण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करावे. पुरातत्व विभाग आणि कंत्राटदार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांसमवेत कामांची पहाणी करून अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत. मंदिरात पाण्याची गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दगडी कोटिंगची (संरक्षणात्मक थराची) कामे पूर्ण करावीत. प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी कामांचा प्रतिदिन आढावा घ्यावा. महालक्ष्मी मंदिर येथे भिंतींना ओलावा धरत असल्याने त्याची पहाणी करून उपाययोजना कराव्यात. पश्चिमद्वारचेही काम चालू करावे.’’

या प्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ‘‘कव्हर शेड’च्या कामामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन येणार्‍या वयोवृद्ध भाविकांना रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी जातांना अडचणी येतात. अधिक मासातील  भाविकांची गर्दी लक्षात घेता हे काम, तसेच महालक्ष्मी आणि बालाजी मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी व्यंकटेश्वर मंदिर अन् महालक्ष्मी मंदिराचे काम तात्काळ पूर्ण करावे.’’