हिंदूंनो, केवळ ‘जन्महिंदु’ नव्हे, तर ‘कर्महिंदु’ व्हा ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

वाशिवली येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ उत्साहात !

सुनील कदम

वाशिवली (ता. रसायनी, जिल्हा रायगड) – अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरावर ध्वजारोहण होणे हा १०० कोटी हिंदूंच्या श्रद्धेचा धर्मध्वज आहे. आज हिंदु समाजासमोर ‘लव्ह जिहाद’सारखी अनेक संकटे उभी आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आणि हिंदु समाज बलशाली करण्यासाठी केवळ जन्महिंदु राहून चालणार नाही, तर प्रत्येकाने धर्माचरण करून कर्महिंदु व्हायला हवे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. येथे ‘सांस्कृतिक आध्यात्मिक सुशोभीकरण मंडळ’ यांच्या वतीने डॉ. पानेरकर महाराज हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मैदानात भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनीही उपस्थितांना धर्माचरणाचे महत्त्व विशद केले. ही सभा यशस्वी करण्यासाठी ‘सांस्कृतिक आध्यात्मिक सुशोभीकरण मंडळा’च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. धर्मकार्यासाठी यापुढेही संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

क्षणचित्रे

१. सभेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला.

२. समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.