हिंदूबहुल भारतात हिंदूंना ‘जागे व्हा !’, असे सांगावे लागणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येेष्ठ व्याख्याते

बोलतांना डॉ. सच्चिदानंद शेवडे

देवगड – आपल्या देशात हिंदू बहुसंख्येने असल्याने या देशात इतर धर्मियांवर अन्याय होत नाही; परंतु आपल्या देशात हिंदूंना ‘जागे व्हा !’, असे दुर्दैवाने सांगावे लागते. धर्माला कोणतेही नाव नाही. सनातन हाच धर्म असून माणसांनी स्थापन केलेले बाकी सर्व पंथ आहेत. पूर्वी लग्न आणि जेवण या दोनच गोष्टींत जातीचा विचार केला जात असे; पण आता या दोन्ही गोष्टी सोडून सर्वच ठिकाणी जातीचा विचार केला जात आहे. असे असेल, तर या जाती कशा मोडणार आहात ? त्यामुळे ही जात आपल्या घरातच ठेवा. घराच्या उंबरठ्याबाहेर ‘मी हिंदु आहे’, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. जातीभेद विसरून सर्व हिंदूंनी एकत्रित राहून आपल्या शक्तीची वज्रमूठ निर्माण करावी, असे मत ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त सकल हिंदू समाज, देवगड आणि मोंड मंडल यांच्या वतीने २९ मार्च या दिवशी जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शुभम् पाटकर (तळेबाजार), प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सच्चिदानंद शेवडे, संमेलनाचे संयोजक विलास रुमडे, सहसंयोजक अधिवक्ता विशाल देवगडकर आदी उपस्थित होते.

संमेलनाला लाभलेली उपस्थिती

संमेलनाच्या प्रारंभी जामसंडे येथील श्री विष्णुदेव मंदिर ते संमेलनस्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संमेलनात विनय प्रभु, विजय घाडी, विश्‍वनाथ घाडी, पुष्पकांत वाडेकर, शामसुंदर कणेरकर (जामसंडे), अनिल खडपकर (देवगड) या सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. रा.स्व. संघाच्या ‘संघयात्रा’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उद्योजक शुभम् पाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विलास रुमडे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार सौ. रेश्मा जोशी यांनी मानले.

यावर्षी कोकणात आंब्याचे उत्पादन अल्प आहे. याची कारणे वेगवेगळी दिली जात आहेत. सध्या येथे काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत. हे रस्ते ४ अंशांनी उष्णता वाढवतात. दुबईसारख्या देशात सिमेंटचे रस्ते विकसित असून त्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. विशेष म्हणजे ते रस्ते भारतीय अभियंत्यांनी बनवलेले आहेत. याचा अर्थ आपल्या देशात असे रस्ते बनवले जाऊ शकतात; परंतु रस्त्यावर खड्डे पडले नाहीत, तर भ्रष्टाचार्‍यांचे खिसे कसे भरणार ? आपण स्वतःपासून हा भ्रष्टाचार दूर केला पाहिजे, असे आवाहन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.