परदेशात जाऊन भारताची अपकीर्ती करणार्‍यांना जनता ओळखते !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर टीका

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. देश वेगाने प्रगती करत असतांना काही लोकांना त्याची ‘पोटदुखी’ होत असून ते परदेशात जाऊन भारताची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत, अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. १२ मार्च या दिवशी ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याविषयी जनतेला आश्वस्त केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

१. संसद चालू असतांना राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची अपकीर्ती करतात. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवायांत सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाचा त्यांना अभिमान वाटत नाही.

२. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानसारख्या देशांना भारताविरुद्ध बोलण्यासाठी आयते कोलीत मिळते. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोचली असून लवकरच ती तिसर्‍या क्रमांकावर जाणार आहे. हे यश न पचल्यामुळेच राहुल गांधी देशविरोधी विधाने करत आहेत.

३. इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे देशात गॅस किंवा इंधन यांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

संपादकीय भूमिका

स्वार्थ आणि राजकारण यांसाठी परदेशात जाऊन आपल्याच राष्ट्राची निंदा करणे, हे राष्ट्राभिमानशून्यतेचे लक्षण आहे. देशाची प्रगती आणि सैनिकांचे शौर्य यांची जाणीव नसलेले राहुल गांधी यांच्यासारखे नेते जनतेचा विश्वास कधीही संपादन करू शकणार नाहीत !