सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे त्रिकालदर्शित्व दर्शवणारे उद्गार आणि भृगु महर्षींनी त्या संदर्भात जीवनाडीपट्टीमध्ये केलेला उल्लेख !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे स्त्रियाच क्रांती करतील’, असे सांगितले होते. भृगु महर्षींनीही जीवनाडीपट्टीमध्ये (चेन्नई, तमिळनाडू येथील जीवनाडीपट्टीवाचक श्री. सेल्वम् गुरुजींनी केलेल्या एका नाडीपट्टीवाचनामध्ये हे सांगितले होते.) अशाच आशयाच्या सूत्राचा उल्लेख केला आहे. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वचनाचे स्मरण झाले.

१. प.पू. डॉक्टरांच्या उद्गाराची येत असलेली प्रचीती

प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या वाक्याचा शब्दार्थ लक्षात घेतला, तर लक्षात येते, ‘सनातन संस्थेमध्ये स्त्रियाच अधिकतर कार्यभार सांभाळतात आणि संस्थेत स्त्रियांची संख्या अधिक आहे.’

‘युगमहिम्यानुसारही हे युग स्त्रीशक्ती कार्याचेच आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते.

२. भृगु महर्षींनी नाडीपट्टीत केलेला उल्लेख आणि त्याचा भावार्थ

भृगु महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केला आहे, ‘साधकांनी आता ‘स्त्रीभाव’ वाढवायला हवा.’ स्त्रीभाव हा ‘पुरुष आणि महिला’ यांच्यामधील लिंगभेदानुसार नसून हा भाव, म्हणजे एकमेव परमपुरुष असलेल्या परमेश्वराशी एकरूप होण्याविषयीचा भाव आहे. याचा एक अर्थ असा आहे की, ‘या संसारात श्रीकृष्ण हाच एकमेव पुरुष आहे. अन्य सर्व जन्माला आलेले जीव या स्त्रियाच आहेत.’

३. ‘स्त्रीभावा’मधील तारकतत्त्व आणि मारकतत्त्व

स्त्रीभावामधील वात्सल्यतेत शक्तीचे तारकतत्त्व आहे, तसेच वेळ आल्यास दुष्प्रवृत्तीचे निर्दालन करणारे शक्तीस्वरूप मारकतत्त्वही त्यात आहे. पुराणातील गोष्टी वाचल्या असता लक्षात येते, ‘अनेक वेळा हसत हसत देवीने अनेक असुरांचा वध केला आहे. तिने असुरांचा वध करण्यापूर्वी मातेच्या वात्सल्याने अनेक असुरांना सुधारण्याची एक संधीही दिली होती; परंतु असुरांनी ते न ऐकल्याने असुरांचे निर्दालनही झाले.’

४. साधकांनी लक्षात घ्यायची सूत्रे

अ. आपल्यातील संघशक्ती वाढण्यासाठी आपल्याला एकमेकांविषयी वात्सल्य आणि प्रेम वाटले पाहिजे. प्रत्यक्षात कुणा एका लिंगाविषयी हे मर्यादित नसून हे स्त्री आणि पुरुष या दोघांविषयी आहे.

आ. पुरुषांसह स्त्रियांनीही याकडे तेवढेच गांभीर्याने पहायला हवे. ‘देवाला अपेक्षित असलेला हा खरा ‘प्रेमभाव आणि वात्सल्यभाव यांचे रूप असलेला स्त्रीभाव’ माझ्यामध्ये कसा येईल ?’, यासाठी साधकांनी प्रयत्न केले पाहिजेत.

इ. ‘आपल्यातील अहंचा लय करून गोपींच्या मनात असणार्‍या देवाविषयीच्या अत्यंत वात्सल्ययुक्त प्रेमाच्या आधारे मला देवाला कसे आळवता येईल ? प्रेमरसपूर्वक संपूर्ण शरणागतभावाने भगवंताला कशी हाक मारता येईल ?’, याचे साधकांनी चिंतन केले पाहिजे.

ई. आई आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्यासाठी प्रसंगी त्याला शिक्षाही करते. हाही तिचा वात्सल्यभावच झाला. मुलावर असलेल्या प्रेमापोटीच ती त्याला शिक्षा करते. साधकांना सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या स्त्रीभावाची आवश्यकता आहे.

उ. आज साधकांनी स्वत:मधील स्त्रीभावाला जागृती देऊन ईश्वरी राज्याच्या दिशेने वाटचाल करतांना लवकर कृतीशील व्हायचे आहे. साधनेच्या या प्रवासात परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी सर्वांमध्ये स्त्रीभाव जेव्हा जागृत होईल, तेव्हा ‘रामराज्य येणे दूर नाही’, असे समजावे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ