अज्ञात भ्रमणभाषवरील संभाषण किंवा संदेश यांना प्रतिसाद टाळा  – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

सातारा, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा बँक तपशील अशी संवेदनशील माहिती विचारणार्‍या अज्ञात भ्रमणभाष क्रमांकांवरील संभाषण किंवा संदेश यांना प्रतिसाद देऊ नका. के.वाय.सी.च्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणार्‍या अज्ञातांना उत्तरे देऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. येथे आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले की, सायबर गुन्हेगारीच्या आहारी जाऊ नये. सायबर गुन्हेगार ओ.टी.पी. आणि ए.टी.एम्. कार्डच्या मागील कोड क्रमांक विचारतात. उच्च परताव्याचे आश्वासन देणार्‍या ऑनलाईन गुंतवणूक विज्ञापनांवरही विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ‘ई-ऑफिस’ पद्धतीने होणार आहे. धनादेश पद्धत बंद होऊन थेट ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. त्यामुळे सर्वांचेच दायित्व वाढेल. कर्मचार्‍यांनीही कार्यपद्धत समजून घेऊन दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करावा.