रामनाथी आश्रमात आल्यावर रायगड येथील सौ. अक्षता अमोल कळमकर यांना जाणवलेली सूत्रे

१. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मी मागे जे काही सोडून आले होते, त्याचे मला पूर्णपणे विस्मरण झाले. असे या आधी कधीही झाले नव्हते.

२. आश्रमात आल्यावर मुलींमध्ये जाणवलेले पालट

मी माझ्या दोन मुलींसह आश्रमात आले होते. ‘आश्रमात त्या दोघी कशा रहातील ?’, असा मला प्रश्‍न पडला होता; परंतु त्यांनी मला कोणताही त्रास दिला नाही. त्या आता शांत झाल्या आहेत. एरव्ही घरी भाज्या खातांना मुली पुष्कळ त्रास देतात; परंतु आश्रमात त्या सगळे पदार्थ आवडीने खायच्या.

३. नामजप आपोआप होणे

मला घरी बसून केलेले नामस्मरण आणि आश्रमात बसून केलेले नामस्मरण यांत पुष्कळ भेद जाणवतो. मी आश्रमात नामजप करतांना माझ्या मनात कोणतेही विचार येत नव्हते. आश्रमात एवढे चैतन्य आहे की, आम्ही कुठेही बसलो, तरी आमचा मनोभावे नामजप चालू व्हायचा. मला येथे प्रत्यक्ष देवाचे दर्शन झाले.

४. मुलगी माहेराहून सासरी जातांना तिची जशी स्थिती होते, तशी आम्ही आश्रमातून घरी जायला निघतांना आमची स्थिती झाली होती. आम्हाला आश्रमात पुन्हा येण्याची आस लागली होती. त्या वेळी सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

आश्रमात आहे संत अन् गुरु यांचा वास अन् भाव ।
येथे नाही कसलाच अभाव ॥ १ ॥

पुनःपुन्हा आश्रमात येण्याची वाट पहावी ।
अशी एकच आस आहे माझ्या मनी’ ॥ २ ॥

– सौ. अक्षता अमोल कळमकर, रायगड (१२.३.२०२०)