प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची नारायण राणेंची मागणी !

प्रकाश आंबेडकर यांच्या ‘६ डिसेंबरनंतर दंगली होतील’ या वक्तव्याचे प्रकरण

पुणे – दंगलीची माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना ‘६ डिसेंबरनंतर दंगली होतील’, असे वक्तव्य केले होते. या सूत्रावरून नारायण राणे यांनी ही मागणी केली आहे.

मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, एफ्.आय.आर्. प्रविष्ट करून त्यांना अटक करण्यात यावी. माहिती कुणी लपवत असेल, तर तो गुन्हा ठरतो. त्यांना अटक करून माहिती विचारायला पाहिजे. दंगलीचा आधार विचारायला पाहिजे. दंगल होणार तर पुरावा द्यावा लागतो. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक बोलत आहेत. त्यांनी आता घरी बसायला हवे. तुम्हाला काय माहिती आहे ? कोण दंगल करणार आहे ? कोण याच्यामागे आहे ? त्यांना अटक करून भविष्यात दंगल घडू नये, यासाठी पोलिसांनी काळजी घ्यावी. पोलिसांनी त्यांना कह्यात घ्यावे. जेणेकरून कायदा-सुव्यवस्था टिकून राहील. आंबेडकर असो किंवा इतर कुणीही, दंगलीविषयी बोलत असेल, तर पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी.