मार्च २०२४ पर्यंत देशभरात १५ सहस्र नवे ‘जनऔषधी केंद्र’ उभारली जातील ! – पंतप्रधान

समाजाला स्वस्तात चांगली औषधे पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न !

नवी देहली – देशभरात सध्या १० सहस्र जनऔषधी केंद्रे चालवली जात असून पुढील मार्चपर्यंत त्यांची संख्या १५ सहस्रांनी वाढवून ती २५ सहस्र करण्यात येतील. या माध्यमातून सामान्य लोकांना स्वस्त औषधे मिळू शकतील, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाच्या वेळी नुकतेच दिले. या वेळी त्यांनी ‘महिला किसान ड्रोन केंद्रा’चे उद्घाटनही केले. त्याच्या माध्यमातून महिला शेतकर्‍यांना कृषी उद्देशांसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘याने त्या सक्षम बनू शकतील’, असेही पंतप्रधान या वेळी म्हणाले.

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, २ ऑक्टोबरपासून चालू करण्यात आलेल्या या मोहिमेने दीड लाखाहून अधिक गावांचा यशस्वीपणे समावेश केला आहे आणि अनुमाने १५ कोटी लोकांना त्याचा लाभ झाला आहे.