पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

काश्मीरमधील उरी येथे करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ७ वर्षांसाठी घातली होती बंदी !

नवी देहली – वर्ष २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील उरी येथे केलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने पाकच्या सर्वच कलाकारांवर भारताच्या प्रवेशावर ७ वर्षांची बंदी घातली होती. आता ती मुदत संपली असून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यावर न्यायालयाने याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला ‘इतका संकुचित विचार करू नका’, असे सांगितले.

याआधी याचिकाकर्ते फैज अन्वर कुरेशी यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, ही याचिका सुनावणीस योग्य नाही. देशभक्त होण्यासाठी शेजारील देशातील लोकांचा द्वेष करणे योग्य नाही, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. यावर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

याचिकाकर्त्याच्या मागण्या !

  • पाकिस्तानी कलाकारांना भारतात कला सादर करण्यास अनुमती देऊ नये.
  • पाकिस्तानी नागरिकांची कोणतीही सेवा किंवा कोणत्याही संस्थेत प्रवेशावर बंदी घालावी.
  • न्यायालयाने केंद्र सरकारला भारतीय नागरिक, आस्थापने आणि संघटना यांनी  पाकिस्तानचे कोणतेही काम करू नये’, असे निर्देश द्यावेत.

संपादकीय भूमिका 

पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !