महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने रत्नागिरीतूनही एकाला घेतले कह्यात

पुणे येथील संशयित आतंकवादी पकडल्याचे प्रकरण

रत्नागिरी – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएसने) येथील एका व्यक्तीला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्यावरून त्याची चौकशी चालू करण्यात आली आहे. याआधी पुण्यातून २ आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणी पुण्यातील मोहंमद युसुफ खान आणि मोहंमद युनुस याकुब साकी यांना अटक करण्यात आलेली आहे. या वेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहंमद शहनवाज आलम हा पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. तत्पूर्वी या तीनही आतंकवाद्यानी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने मोहंमद शहनवाज आलम याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीसही घोषित केले आहे.