छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणे आक्रमण !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

छत्रपती संभाजीनगर – शहरात अन्वेषणासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणे आक्रमण करण्यात आले आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना कह्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर ३० ते ३२ लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुर्‍हाडीने आक्रमण केले, तसेच पोलीस घोटाळ्यातील संशयित आरोपींनाही जमावाने पळवून लावले आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१. मुंबई येथील दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद चितळकर यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सद्या ते गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत आहे.

२. पोलीस भरती प्रकरणाचे अन्वेषण करत असतांना ते स्वत:च्या पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथे जनकसिंह सिसोदे आणि संतोष गुसिंगे या २ संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आले होते.

३. या वेळी त्यांच्यासमवेत स्थानिक पोलीसही होते. गावात गेल्यावर आरोपींच्या नातेवाइकांनी आरडाओरडा करत जमाव जमा केला. या वेळी ३० ते ३२ लोक लाठ्या-काठ्या आणि कुर्‍हाड घेऊन जमा झाले, तसेच जमावाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली.

४. जमावातील एकाने हातातील कुर्‍हाड घेऊन पोलीस कर्मचारी विनोद चितळकर यांच्या डोक्यावर आक्रमण केले; मात्र त्यांनी वेळीच स्वतःचा बचाव करत वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला; पण याच वेळी त्यांच्या ओठाला कुर्‍हाडीचा दांडा लागला.

संपादकीय भूमिका 

  • आता पोलिसांचेही संरक्षण करण्याची वेळ आली आहे !

  • पोलिसांवरच जमावाकडून आक्रमण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? यातून पोलिसांचा धाक अल्प होत आहे, हे लक्षात येते.