‘स्वाधार’ योजनेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विधानसभा प्रश्नोत्तरे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने वर्ष २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजना चालू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा यांसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते. या वर्षी म्हणजेच वर्ष २०२२-२३ मध्ये ३३ सहस्र ७७४ अर्ज प्राप्त झाले असून यासाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

सदस्य राजेश एकडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांनी विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेपासून वंचित असल्याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून १ सहस्र १७८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यांपैकी १ सहस्र ९४ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र होते. पात्र अर्जांपैकी आतापर्यंत ९१२ विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ योजनेचा लाभ दिला गेला असून उर्वरित १८२ विद्यार्थ्यांना ३१ मार्चपूर्वी या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड सांगितले.