कोकण कृषी विद्यापीठाकडून बागायतदारांना मार्गदर्शक सूचना

वाढत्या उष्म्याच्या पार्श्‍वभूमीवर झाडावर आंबा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

दापोली – दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्म्याचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला आहे. यावर्षी जिल्ह्यात आंब्याचे (हापूसचे) उत्पादन पहिल्या टप्प्यात अल्प रहाणार आहे. झाडावर आलेला आंबा टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. कोकण कृषी विद्यापिठाकडूनही बागायतदारांना आंबा पिक वाचवण्यासाठी सूचना घोषित करण्यात आल्या आहेत. या सूचना अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई वेधशाळेतून प्राप्त झालेल्या हवामान सूचनेनुसार, मार्च मासात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे तापमानात वाढ दिसून आली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात आंबा आणि काजू हे मोहोर ते फळपक्वतेच्या सर्व अवस्थेमध्ये आहे. हवामान अंदाजानुसार, तापमानात वाढ झाल्यामुळे आंबा फळगळ होण्याची, तसेच फळे भाजण्याची किंवा तडकण्याची शक्यता आहे.

कृषी विद्यापिठाने केलेल्या सूचना

१. आंब्याच्या झाडाला सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्यात यावे.

२. झाडाच्या बुंध्याजवळ गवताचे आच्छादन करावे.

३. फळांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोटी आकाराच्या टिकलेल्या आंबा फळांना कागदी (वर्तमानपत्रापासून बनवलेल्या) पिशव्या लावाव्यात, तसेच फळगळ न्यून करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का द्रावणाची फवारणी करावी.

४. वाटाणा, गोटी आणि सुपारी आकाराच्या आंबा फळांवर करण्याचा सल्ला कृषी सल्ला पत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

५. कृषी सल्ल्यानुसार नियोजन केल्यास फळांची गळ न्यून होईल. विद्यापिठाने शिफारस केलेल्या आंबाफळांना कागदी पिशव्याचे आवरण घालण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर बागेत केल्यास अधिक लाभ बागायतदारांना होईल.