राज्‍यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्‍ह्यात !

६०२ जणांचा अपघाती मृत्‍यू !

नाशिक – जिल्‍ह्यात रस्‍ते अपघातांची संख्‍या वाढत असून गेल्‍या ६ मासांच्‍या कालावधीत नाशिक शहर आणि जिल्‍ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्‍यू झाला आहे. मागील काही वर्षांपासून रस्‍ते अपघातांचे प्रमाण वाढले असून राज्‍यातील ६ मासांची आकडेवाडी पहाता १७ सहस्र २७५ अपघात झाले असून यात ८ सहस्र ६८ जणांचा विविध अपघातांत मृत्‍यू झाला आहे. राज्‍यातील आकडेवारी पहाता नाशिक जिल्‍ह्यात सर्वाधिक मृत्‍यू झाल्‍याची नोंद करण्‍यात आली आहे.

नगर येथे ४५१, पुणे जिल्‍ह्यात ४६१, शहरात १६५, तर मुंबई शहरात १५६ अपघाती मृत्‍यू झाले आहेत.

नाशिक येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत म्‍हणाले, ‘‘रस्‍ते अपघात रोखण्‍यासाठी विभागाकडून ‘रस्‍ते सुरक्षा’ अभियानांतर्गत प्रभावी नियोजन केले जात आहे. जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या सूचनेप्रमाणे अपघाताचे क्षेत्र (ब्‍लॅक स्‍पॉट) निश्‍चित करण्‍यात येत असून या जागांवर अपघात रोखण्‍यासाठी नियोजन केले जात आहे.’’