अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे १५ दिवसांत ३ वेळा पशूवधगृहावर कारवाई !

कारवाईमध्ये १३३ गोवंशियांची सुटका  

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – १७ फेब्रुवारी या दिवशी येथील पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्‍या ८ गोवंशियांची पोलिसांनी सुटका केली. यासमवेतच १८ फेब्रुवारी या दिवशी पोलीस अधीक्षक आर्. राजा यांच्या पथकाने बाराभाई गल्लीतील पशूवधगृहावर धाड टाकून हत्येसाठी आणलेल्या ११० गोवंशियांची सुटका केली. मागील १५ दिवसांत पशूवधगृहावर ३ वेळा धाड घालण्यात आली असून ३ फेब्रुवारी या दिवशी १५ गोवंशियांची सुटका करण्यात आली होती. (१५ दिवसांतील धाडी आणि त्यातून गोवंशियांची मोठ्या संख्येने झालेली सुटका पहाता अंबाजोगाई हे गोवंशियांच्या हत्येचे मोठे ठिकाण असल्याचे स्पष्ट होते. – संपादक)  

१७ फेब्रुवारी या दिवशी एका टेंपोतून गोवंशियांना अंबाजोगाई येथील  पशूवधगृहाकडे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून स्वत: जायभाये आणि त्यांचे पथक यांनी धाड टाकून गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो कह्यात घेतला. या प्रकरणी शेख राजू शेख रफिक आणि शोएब खुरेशी या दोघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची वाहतूक होते, यावरून गोतस्करांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. हा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)