माहेश्‍वरी समाजातील डॉक्टर दांपत्याने केला लातूर येथील गोशाळेत विवाह 

प्रतीकात्मक छायाचित्र

लातूर – शहरातील माहेश्‍वरी समाजातील डॉ. भाग्यश्री झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डॉ. सचिन चांडक यांचा विवाह येथील श्री गुरु गणेश जैन, गोशाळेत करण्यात आला. या विवाह सोहळ्यात गोशाळेत गायींना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. (अनावश्यक व्ययाला फाटा देत गोशाळेत विवाह करून डॉ. भाग्यश्री झंवर आणि डॉ. सचिन चांडक यांनी एक चांगला उपक्रम केला आहे. या निमित्ताने समाजात गायींचे महत्त्व पोचण्यास साहाय्य होईल ! – संपादक)

डॉ. भाग्यश्री झंवर आणि डॉ. सचिन चांडक यांचा ६ मासांपूर्वी विवाह निश्‍चित झाला होता. या विवाहातून समाजाला काहीतरी संदेश मिळावा आणि अत्यल्प व्ययात हा विवाह सोहळा पार पडावा, या उद्देशाने येथील श्री गुरु गणेश जैन गोशाळेत २०० गाईंच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यास भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी उपस्थिती दर्शवून दोन्ही कुटुंबियांचे अभिनंदन केले.