आयआयटी प्रकल्पासाठी नवीन भूमी शोधण्यासाठी तज्ञांचा गट नेमणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मडगाव, १८ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात आयआयटी प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकार सुमारे ४ ते ५ सदस्यांचा समावेश असलेला एक तज्ञांचा गट बनवणार आहे. या गटात शिक्षण तज्ञ, आयआयटी पदवीधर आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘हा तज्ञांचा गट राज्यात आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी असलेल्या भूमीची पहाणी करणार आहे. स्थानिकांना विश्‍वासात घेणे आणि मेळावली येथे आलेल्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी हा तज्ञांचा गट नेमण्यात येत आहे. गोव्यात आयआयटी प्रकल्प झालाच पाहिजे आणि या प्रश्‍नी सरकार गंभीर आहे. तज्ञांच्या गटाच्या शिफारसीनंतर सर्व पर्यायांचा विचार करूनच योग्य निर्णय सरकार घेणार आहे.’’