४३ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून हडपली ४ हेक्टर भूमी

भ्रष्ट दुय्यम निबंधकासह तिघांवर गुन्हा नोंद

शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी कधी संपू शकते का ?

संभाजीनगर – जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील जानकीराम आबाजी औटी यांचे साधारण ४३ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची सोयगाव तालुक्यातील वरखेडी खुर्द गावातील भूमी संरक्षित कुळ म्हणून दुलचंद बालचंद डोभाळ नावाच्या कुटुंबाला वर्ष १९६० मध्ये देण्यात आली होती. सोयगाव येथील निबंधक कार्यालयात ४३ वर्षांनंतर निधन झालेल्या औटी यांना कागदोपत्री जिवंत दाखवून डोभाळ कुटुंबाची ४ हेक्टर ४९ आर् इतकी भूमी परस्पर नावावर करून विकण्याचा प्रयत्न झाला आहे. दळणवळण बंदीच्या कालावधीत महत्त्वाच्या ठिकाणी स्वाक्षरी टाळून हा घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला. सोयगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी पदमसिंग हिरासिंग राजपूत, दुय्यम निबंधक नरवडे यांच्यासह तोतया व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे आरोपी सध्या पसार आहेत.