लॅटव्हियामध्ये (युरोप) अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी साहाय्य करणार ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील ३७ विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांचा भारतात परतण्यासाठी केंद्रशासनाशी संपर्क चालू आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय, विदेश मंत्रालय, तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री उदय सामंत म्हणाले,

१. रीगा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना तेथे कोणत्याही स्वरूपाचे साहाय्य अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत.

२. कोणतेही साहाय्य न झाल्याने भीतीपोटी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे.

३. विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर संपर्क झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन आणि केंद्रशासन यांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

४. भारतातील ३७ विद्यार्थी असून यामध्ये महाराष्ट्रातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

५. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने साहाय करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काळजी करू नये.