भाग्यनगर येथे हत्येसाठी नेण्यात येणारे ११४ उंट नाशिक येथे कह्यात !

अ‍ॅनिमल वेल्फेअर पथकाची कारवाई !

नाशिक – राजस्थान येथून भाग्यनगर (हैद्राबाद) येथे हत्येसाठी पाठवण्यात येणार्‍या ८५ उंटांची ४ मे या दिवशी सुटका केल्यानंतर ५ मे या दिवशी मखमलाबाद परिसरातून आणखी २९ उंट कह्यात घेण्यात आले. हे उंट भाग्यनगर येथे पायी वाहतूक करून नेले जात होते, अशी माहिती अ‍ॅनिमल वेल्फेअरच्या कार्यकर्त्यांनी दिली. ४ मे या दिवशी सायंकाळी ८५ उंटांना चुंचाळे येथील पांजरापोळ संस्थेत पाठवण्यात आले आहे.

१. राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात उंट भाग्यनगर येथे हत्या करण्यासाठी नेत असल्याचा संशय ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर’चे पुरुषोत्तम आव्हाड यांनी व्यक्त केला होता. हे उंट राजस्थान येथून गुजरातमार्गे महाराष्ट्रात आले.

२. धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी एवढ्या संख्येने उंट जात असतांना चौकशीही केली नाही, तसेच शहर पोलिसांकडूनही कारवाई झाली नाही.

३. आव्हाड यांनी पांजरापोळ प्रशासनाशी संपर्क साधत या ८५ उंटांना निवारा देण्याची विनंती केली. पांजरापोळ संस्थेने होकार देत उंटांना चुंचाळे येथे ठेवण्याची सिद्धता दर्शवली. सायंकाळी मखमलाबाद परिसरात २९ उंट असल्याची माहिती आव्हाड यांना मिळाली. वाहतूक करणार्‍यांनी उंट भाग्यनगर येथे नेत असल्याची माहिती दिली.

४. अ‍ॅनिमल वेल्फेअरचेे पुरुषोत्तम आव्हाड यांनी प्रसंगावधानता दाखवत या उंटांसाठी धडपड चालू केली. या प्रसंगी त्यांच्यासह नानासाहेब घोडके, डॉ. वाणी, श्रीमती प्रजापती, प्रांजल मालपुरे, वेदांत तिदमे उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

  • जे अ‍ॅनिमल वेल्फेअर पथकाला दिसते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का दिसत नाही ? पोलिसांची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का ? या प्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
  • ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर पथका’ने चांगली कारवाई केल्याविषयी त्या संघटनेचे अभिनंदन !