तेलंगाणा सरकारच्या अडथळ्यांमुळे जनता त्रस्त ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

उजवीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाग्यनगर – तेलंगणा राज्य सरकार आम्हाला साथ देत नसल्याने अनेक विकास कामांना विलंब होत आहे. हे लोक कुटुंबवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार जोपासत राहिले. त्यामुळे जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या अडथळ्यांमुळे तेलंगणा त्रस्त आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदी यांनी सिकंदराबाद-तिरुपती या मार्गावर धावणार्‍या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ‘तेलंगणाचा विकास आम्ही थांबू देणार नाही. केंद्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण योजना विकसित केली आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांच्या अधिकोष (बँक) खात्यांत थेट पैसे पाठवले जातात’, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वोत्तम अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते; मात्र भारत पुढे जात आहे. तेलंगणात गेल्या ९ वर्षांत रेल्वे अर्थसंकल्पामध्ये अनुमाने १७ पटींनी वाढ करण्यात आली आहे. नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम असो किंवा दुपदरीकरणाचे काम असो, केंद्र सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे ते झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचेही दुपदरीकरण झाले आहे.